घरबसल्या करमणूक हा एक महत्त्वाचा लाभ असलेल्या दूरदर्शनवरील मालिका आता लोकांच्या रोजच्या जीवनाचा एक भाग ठरल्या आहेत. बहुतेक वेळा असे दिसते की, यात भूमिका निभावणारे कलाकार उत्तम असतात, हक्काचा प्रेक्षकवर्ग असतो पण तरीही प्रेक्षकांना बराच काळ गुंतवून ठेवणे मालिकांना अवघड जाते. कित्येकदा असे होते की, या मालिका सुरुवातीला आकर्षक वाटतात. मात्र काही भाग झाल्यावर मालिकेत तोच तोचपणा येऊ लागतो. संवाद सपक होऊ लागतात. गती संथ होऊ लागते. मग नावीन्य आणण्यासाठी मधेच एखादे नवीन पात्र घुसडले जाते. पोलीस केस वगैरे होते पण हळूहळू मालिकेतला रस आटू लागतो.
माझ्या नवऱ्याची बायको, तुझ्यात जीव रंगला, घाटगे अँड सून वगैरे मालिका आता कधी संपणार म्हणून प्रेक्षक वाट बघू लागलेत. काहीतरी नवीन, वेगळे मिळावे असे प्रेक्षकांना वाटू लागले आहे. अलीकडेच अग्गंबाई सासूबाई ही मालिका लोकप्रिय होऊ लागली आहे. प्रौढ वयातही जोडीदार हवासा वाटतो, हा काहीसा आधुनिक विचार, निवेदिता सराफसारखी गुणी अभिनेत्री यांमुळे या मालिकेकडे प्रेक्षक आकर्षित झाले. पण नवऱ्याच्या माघारी सगळा संसार खंबीरपणे सांभाळणारी आजच्या काळातली पन्नाशीची सुशिक्षित बाई इतकी बावळट, घाबरट कशी काय? अतिलाडाने मुलगा बिघडल्याचे तिच्या लक्षात कसे येत नाही? टीव्ही बघताना डोकं वापरायचं नसतं, हे विसरणाऱ्या लोकांना असे प्रश्न आता पडू लागले आहेत.
“रंग माझा वेगळा’सारख्या काही मालिका फारच बटबटीत होत आहेत.
आपल्या आजूबाजूला दिसणारी, वास्तवातली माणसं मालिकेत का दिसू नयेत? अनेकांना असंभव, अग्निहोत्र, सोनियाचा उंबरा अशा काही मालिका आठवत असतील. त्यांचं कथानक मुळात सशक्त होतं. भावनांचा परिपोष चांगला केलेला असे. आताच्या बऱ्याचशा मालिकांमधे सखोलता, तर्कशुद्धता, स्वाभाविकपणा अभावानेच आढळतो. अलीकडेच अग्निहोत्र दोन या नावाने नवीन मालिका सुरू झाली आहे. अग्निहोत्र ही मूळ संकल्पना तशीच ठेवून त्याभोवती कथानक गुंफले आहे. सध्या तरी ही मालिका इंटरेस्टिंग वाटते आहे.
“नवरी मिळे नवऱ्याला’ ही मालिकाही आवर्जून पाहावी अशी! मराठवाडा भागातील एका शेतकरी कुटुंबातील ही कथा. हल्ली खेड्यात राहणे कुणालाच नको आहे. मुलींना खेड्यातील नवरा नको. त्यात शेतकरी तर मुळीच नको असतो. याचे मुख्य कारण म्हणजे त्याच्या उत्पन्नातील अनियमितता! सध्याचे हे कटू वास्तव लक्षात घेऊन ही मालिका सुरू होते. पण म्हणून यात गरिबीचे रडगाणे नाही. भालेराव हे कुटुंब अगदी सहजसाधे आहे. एकूणच या मालिकेत दिसणारी सहजसुंदरता हे तिचे बलस्थान आहे. यात कुणीही खलनायक नाही. चहाडखोर, भांडखोर, चुगलखोर असे कुणीही नाही. मग आहे काय या मालिकेत… असे वाटेल तुम्हाला! तर यात आहे घरगुती खेळीमेळीचे वातावरण. दुसरे एक कुटुंब आहे ते काटे! भालेरावांना चार मुलगे तर काटेंना चार मुली! सर्वजण उपवर. प्रत्येक मुलाची, मुलीची काही स्वप्ने आहेत. “थोडा है, थोडे की जरूरत है’ अशी सगळ्यांची अवस्था आहे. जशी सगळ्याच सर्वसामान्य माणसांची असते तशी!
नवरी मिळे नवऱ्याला या मालिकेतले वातावरण, एकमेकांशी असलेले स्नेहसंबंध, वागण्याची तऱ्हा… हे सारे अस्सल वाटते; हेच या मालिकेचे मला वेगळेपण वाटले. आनंद, राग व्यक्त करण्याची त्यांची तऱ्हा नैसर्गिक वाटते. पात्रांची निवड तर भलतीच चपखल. त्या त्या भूमिकेत सर्वजण अगदी फिट्ट बसतात. सगळे सुशिक्षित आहेत. प्रत्येक प्रदेशातील भाषेचा एक वेगळा लहेजा असतो तो सर्वांनी छान सांभाळला आहे. त्यांचे बोलणे कुठेही ओढूनताणून आणल्यासारखे वाटत नाही. या कथानकामधल्या कुणालाही मुद्दाम कुणाचे काही वाईट करावे वाटत नाही; पण समज गैरसमज होत राहतात. ते दूरही होतात. कर्तबगार आई आणि तिची चार तरुण मुलं, कुटुंबवत्सल वडील; काटेंच्या घरातही चारजणींच्या चार तऱ्हा! वडील थोडे पटकन निराश होणारे; पण आई व्यवहारी! त्या बहिणींचे आपसातले रागलोभ… भालेरावांच्या घरातल्या मुलांची एकमेकांशी होणारी भांडणं आणि पुन्हा होणारी दिलजमाई… बोलता बोलता माणसं गहिवरून येतात. सगळे खेड्यातल्या माणसांसारखेच उत्स्फूर्त, निर्व्याज आणि इरसालही!
खरे तर अशा कितीतरी चांगल्या दर्जाच्या मालिका निर्माण होऊ शकतात. मराठी साहित्यात कथानकांची कमतरता नाही. अभिनेते-अभिनेत्री उत्तम मिळू शकतात. खर्चातही कुठे कमतरता नसते. मग अडते कशात? हे सगळेच प्रकरण थोडे गांभीर्याने घेतले; उत्तम, रोचक कलाकृती तयार करून ती सादर करण्यासाठी थोडा धीर ठेवला, परिश्रम घेतले तर प्रेक्षकांना नक्कीच चांगल्या कसदार मालिका पाहायला मिळू शकतील.
माधुरी तळवलकर