भाजप विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या संघर्षात सरशी कोणाची, आठ विधानसभा मतदारसंघांची समीकरणे बदलणार?
करिष्मा कोणाचा चालणार?
भाजप राष्ट्रवादीकडून सातारा जिल्हा हिसकावून घेणार की राष्ट्रवादी कॉंग्रेस साताऱ्यातील इभ्रत जपणार, याचा निकाल उद्याच्या मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे. प्रामुख्याने जिल्ह्यातील लढती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या करिष्म्याभोवती फिरल्या आहेत. त्यामुळेच निकालाची उत्सुकता ताणली गेली आहे.
सातारा – लोकसभा पोटनिवडणूक आणि जिल्ह्यातील आठ विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जोरदार संघर्ष प्रचारात पाहायला मिळाला. त्यामुळेच उद्या होणाऱ्या मतमोजणीत काय होणार, याकडे राजकीय गोटाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्याला भाजप शह देणार का, याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. आगामी काळात जिल्ह्याच्या चाव्या भाजपकडे जाणार की राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच राहणार, याची उत्कंठा शिगेला पोहचली आहे.
साताऱ्याचा बालेकिल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेस राखणार की जिल्ह्याची राजकीय सूत्रे भाजप हाती घेणार, या प्रश्नाची उत्सुकता गुरुवारी संध्याकाळपर्यंत ताणली जाणार आहे. जिल्हयावरची राष्ट्रवादी कॉंग्रेसची “पॉवर’बाज राजकीय पकड पक्षाला तारणार की भाजपची पक्षांतराची खेळी यशस्वी होणार, याचे अंतिम चित्र निकालानंतर स्पष्ट होणार आहे. यंदाची विधानसभा निवडणूक शरद पवार विरुद्ध नरेंद्र मोदी अशीच लढली गेली. विकासाच्या मुद्यावर फारसा प्रचार न होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादीचेच बलाढ्य नेते गळाला लावून राष्ट्रवादीची सातारा जिल्हयात प्रचंड कोंडी केली. उदयनराजे भोसले व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे पक्षप्रवेश घडवून सातारा भाजपचा बालेकिल्ला होईल, याची दक्षता चंद्रकांत दादांनी घेतली. कराड दक्षिणने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे.
कॉंग्रेसचे जिल्ह्यातील एकमेव उमेदवार मजा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात अतुल भोसले यांच्या रूपाने भाजपने मोठी ताकद लावली आहे. कराड दक्षिणचे माजी आमदार विलासकाका पाटील उंडाळकर यांचे पुत्र ऍड. उदयसिंह उंडाळकर यांच्या उमेदवारीने शह काटशहाचे राजकारण झाले. जिल्हयात सर्वाधिक मतदान याच मतदारसंघात झाल्याने निकालाची उत्सुकता प्रचंड आहे. साताऱ्यात शिवेंद्रराजे यांना लढत सोपी मानली जात असली तरी अवघे 59 टक्के झालेले मतदान आणि दीपक पवार हे “डार्क हॉर्स’ ठरू शकतात, हे गृहित धरले तर साताऱ्यात कडवी लढत पाहयला मिळू शकते.
माण मतदारसंघात गोरे बंधूंच्या भांडणाचा “आमचं ठरलयं’ टीमच्या प्रभाकर देशमुख यांच्या पथ्यावर पडल्याची चर्चा आहे. फलटणमध्ये रामराजेंचा गड भेदण्याची किमया खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मदतीने भाजपच्या दिगंबर आगवणेंना साधता येईल की नाही, याची जोरदार चर्चा आहे. वाईमध्ये मकरंद पाटील यांच्या विक्रमी मताधिक्याचा दावा केला जात असतान मदन भोसले यांच्या रूपाने भाजपने केलेली राजकीय बेरीज किती जुळली याचे चित्रही उद्या स्पष्ट होणार आहे.
कोरेगावमध्ये शशिकांत शिंदे विरूध्द महेश शिंदे यांच्या लढतीत खेड ग्रामपंचायतीसह सातारा तालुक्यातील गावांनी कोणाला कौल दिला, याची उत्सुकता आहे. कराड उत्तरमध्ये शिवसेनेचे धैर्यशील कदम आणि मनोज घोरपडे यांच्यातील मतविभागणीचा फायदा राष्ट्रवादीच्या बाळासाहेब पाटलांना होणार, अशा अटकळी बांधल्या जात आहेत. पाटण विधानसभा मतदारसंघातही पारंपारिक देसाई व पाटणकर यांच्या तुल्यबळ लढतीचा आलेख मांडला जात आहे.