शंभूराज देसाईंनाही मिळणार निष्ठेचे फळ? पृथ्वीराज चव्हाणांचा निर्णय दिल्लीत
संतोष पवार
सातारा – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, हिवाळी अधिवेशनही संपले. आता दोन-तीन दिवसात राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असून राष्ट्रवादीकडून पक्षश्रेष्ठी आ. मकरंद पाटील आणि आ. बाळासाहेब पाटील या दोघांपैकी नक्की कोणाला संधी देतात याचीच उत्सुकता लागून राहिली आहे. तसेच पाटणचे शिवसेनेचे आ. शंभूराज देसाई यांना पक्षनिष्ठेचे फळ देवून पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना मजबुतीकरणावर भर देण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा असून त्यांच्याबाबतचा निर्णय कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी घेणार आहेत. त्यामुळे जिल्ह्याला तीन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राज्यात घडलेल्या सत्ता नाट्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व मित्रपक्षांचे सरकार स्थापन होऊन मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर उध्दव ठाकरे विराजमान झाले. ठाकरे सरकारने विश्वासदर्शक ठरावही जिंकून तिन्ही पक्षातील दोन दिग्गज नेत्यांना मंत्रीपदाची संधी दिली. त्यानंतर राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार होईल, असे संकेत होते. मात्र, हिवाळी अधिवेशनानंतर विस्तार करण्याचे सुतोवाच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले होते. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील कोणा कोणाची मंत्रीपदी वर्णी लागणार? पालकमंत्री कोण होणार? याची उत्सुकता जिल्हावासियांना लागून राहिली आहे.
जिल्ह्यात राष्ट्रवादीचे तीन, कॉंग्रेस एक, भाजप दोन, शिवसेना दोन असे आमदार निवडून आले आहेत. वाईचे आ. मकरंद पाटील, कराड उत्तरचे आ. बाळासाहेब पाटील, कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण, पाटणचे आ. शंभूराज देसाई यांना मंत्रीपद देवून पक्ष त्यांचा सन्मान करेल, अशी शक्यता पहिल्यापासून वर्तवली जात आहे. मात्र हे सरकार तीन पक्षांचे असल्याने सर्वांनाच संधी मिळेल अशी शक्यता नसल्याचे पक्षश्रेष्ठींकडून सांगण्यात येत आहे. पक्षीय समतोल साधला तरी सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीतून आ. मकरंद पाटील आणि आ. बाळासाहेब पाटील या दोघांना मंत्रीपदे मिळण्याची शक्यता कमी आहे. या दोघांपैकी पक्षश्रेष्ठी कोणाला लालदिवा देतात? याकडे लक्ष लागून राहिले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि कै. लक्ष्मणराव पाटील यांचे संबंध सर्वज्ञात आहेत.
सत्ता असतानाही आणि नसतानाही लक्ष्मणतात्या आणि त्यांचे चिरंजीव आ. मकरंद पाटील यांची पवारांवरील व पक्षावरील श्रद्धा कमी झाली नाही. त्यामुळे मकरंद पाटील यांना लाल दिवा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तर आ. बाळासाहेब पाटील यांनीही पहिल्यापासून शरद पवारांवर श्रध्दा ठेवत पक्षवाढीसाठी प्रयत्न केले आहेत. पवारांचे विश्वासू सहकारी म्हणूनही त्यांची ओळख आहे. कराड येथील दौऱ्यात पवार यांनी बाळासाहेब पाटील यांच्या मंत्रीमंडळातील समावेशाचे संकेत दिले होते. त्यामुळे बाळासाहेब मंत्री होतील अशीही शक्यता आहे. पाटणचे आ. शंभूराज देसाई यांनी कायम शिवसेनेशी एकनिष्ठ राहून जिल्ह्यात शिवसेना जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. उद्धव ठाकरे यांनीही नेहमीच शंभूराज यांना ताकद दिली असून देसाईंच्या रुपाने जिल्ह्यात शिवसेनेचा मंत्री मिळून शिवसेनेचा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देसाई यांचा समावेशही निश्चित मानला जात आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मंत्रीमंडळात समावेश झाला तर जिल्ह्यात पर्यायाने पश्चिम महाराष्ट्रात कॉंग्रेसला बळकटी मिळणार असल्याने चव्हाण मंत्रीपदासाठी इच्छुक आहे. मात्र पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण या दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांना मंत्रीपद देण्याबाबत नकार दिल्याचे वृत्त आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि पक्षाध्यक्ष बाळासाहेब थोरात याबाबत सोनिया गांधी यांना भेटणार असून त्यानंतर आ. चव्हाण मंत्री होणार की नाही? हे स्पष्ट होणार आहे.
सातारा जिल्ह्यात कॉंग्रेसला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण मंत्री व्हावेत, अशी अपेक्षा कॉंग्रेसजनांची आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचे जिल्ह्यात सहा आमदार आहेत. त्यापैकी चार आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक असले तरी सध्याच्या परिस्थितीत आघाडीतील प्रत्येक पक्षाला निदान एक तरी मंत्रीपद मिळेल, अशी अपेक्षा आहे. मंत्रीपदाबाबत जिल्ह्यात उत्सुकता असून आगामी दोन ते तीन दिवसात याबाबत चित्र स्पष्ट होणार आहे.