आळंदी (पुणे) – संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त (कार्तिक सोहळा) अलंकापुरी अर्थात आळंदीत रविवार (दि. 6) ते मंगळवार (दि. 15) पर्यंत येणाऱ्या मार्गांवर नाकाबंदी करून संचारबंदी लागू करण्याचा आदेश, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त मंच्चाक इप्पार यांनी दिली.
माऊलींचा समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत कार्तिक सोहळा रंगणार आहे. त्याची सुरुवात मंगळवार (दि. 8) ते सोमवार (दि. 14) पर्यंत चालणार आहे. मात्र, यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर सोहळ्याप्रसंगी गर्दी होवू नये म्हणून पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाकडून पंढरपूरच्या धर्तीवर संचारबंदी लागू करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत.
देवस्थानचे विश्वस्त ऍड. विकास ढगे-पाटील म्हणाले की, करोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीचा आदेश पाळून सोहळा पार पाडली जाईल. वारकऱ्यांच्या आरोग्याची दक्षता घेण्यासाठी मंदिरात थर्मल स्कॅन करून प्रवेश दिला जाईल. देऊळवाड्यात मंगळवारी गुरू हैबतबाबा पायरीपूजनासाठी 30 जणांना परवानगी आहे. माऊलींच्या समाधीवरिल महापूजा आणि दर्शन लाईव्ह स्वरूपात सोशल मीडिया आणि चॅनलद्वारे दाखविले जाणार आहे. तसेच सोहळा काळात 500 ते 600 वारकऱ्यांना दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, जिल्हाधिकारी देशमुख यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. कार्तिकी एकादशी शुक्रवारी (दि. 8) पहाटपूजेकरीता आणि माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी 50 जणांना मंदिर प्रवेश राहिल. किर्तन जागरला साथ देण्यासाठी 15 टाळकरी परवानगी आणि परंपरेने सेवा करणाऱ्या कुटुंबातील पाच व्यक्तींनाच प्रवेश आहे. सेवा झाली की लगेच माघारी फिरावे लागणार आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.
या गावांमध्ये संचारबंदी
आळंदीसोबतच चऱ्होली खुर्द, केळगाव, चिंबळी, वडगाव घेनंद, कोयाळी, धानोर, सोळू, मरकळ आणि पिंपरी महापालिका हद्दीतील चहोऱ्होली बुद्रुक, डुडुळगाव या गावांमध्ये अत्यावश्य सेवा वगळता इतरांना संचारबंदी आहे. संचारबंदी काळात हॉटेल, लॉजिंग, धर्मशाळेत रहिवास करण्यास पूर्ण बंदी आहे. तर आगोदर जे राहण्यास आहेत, त्यांना बाहेर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या गोष्टी असतील महत्त्वाच्या…
1. मंदिरात येताना रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट अनिवार्य
2. इंद्रायणी नदीत जाण्यास करण्यास बंदी
3. मंदिराबाहेर नदीत स्नान करण्यास बंदी
4. धर्मशाळा, लॉजिंगमध्ये निवासास प्रतिबंध
5. प्रवासी वाहतूक बंद; पर्यायी मार्ग वापरा
6. आळंदीला येणाऱ्या रस्त्यांवर नाकाबंदी असून प्रवासी वाहतूक बंद राहिल.
7. मरकळ, शिक्रापूर चाकणकडे जाणारी औद्योगिक वाहने आळंदीतून न येता चऱ्होली-आळंदी बायपास आणि पुणे नगर महामार्गावरून वळविण्यात येणार आहे.
8. कामगार वर्गाने नियुक्तीचे ओळखपत्र, आधारकार्ड जवळ बाळगणे आवश्यक आहे.