करोना पसरू नये म्हणून ग्रामपंचायतींनी उचलली कडक पावले
ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून
करोना व्हायरसच्या प्रादूर्भाव केवळ पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरात झाला आहे. मात्र, हा रोग पसरू नये म्हणून या शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही काळजी घेण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी ग्रामपंचायतींनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून अनेक गावांमधील यात्रा, आठवडे बाजार रद्द केले असून एकाठिकाणी जास्त लोक जमा होणार नाहीत यासाठी दक्षता घेतली जात आहे. तर “रोगापेक्षा इलाज बरा’ म्हणत ज्या-ज्या उपाययोजना करता येतील त्या-त्या करण्यासाठी ग्रामपंचायती सरसावत आहेत.
करंजेपूलचा आजचा आठवडेबाजार रद्द
आर्थिक उलाढालीवर झाला थेट परिणाम
वाघळवाडी(वार्ताहर) -“करोना’च्या पार्श्वभूमीवर सोमेश्वरनगर (ता. बारामती) परिसरातील करंजेपूलचा आठवडे बाजार मंगळवारी (दि. 17) भरणार नसल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, करोनाबाबत ग्रामीण भागात भीती असली तरी नागरिक योग्य ती दक्षता घेत आहेत.
सोमेश्वरनगर परिसरात गजबजलेले ठिकाण सध्या सुने पडले असून जो-तो “करोना’च्या धास्तीने काम आटोपल्यानंतर थेट घराकडे जाणे पसंत करीत आहे तर अनेक जण घरात राहणेच पसंत करीत आहेत. गावातील मुख्य चौक, मुख्य रस्ते, हॉटेल्स, चहाच्या टपऱ्या व बसण्याची मुख्य ठिकाणांवर लोक येणे टाळत असल्याने सर्वत्र स्मशान शांतता पसरलेली जाणवते आहे, ग्रामीण भागातील आर्थिक उलाढालीवर थेट परिणाम होत आहे.
रांजणगाव गणपती येथील आठवडे बाजार बंद
रांजणगाव गणपती (वार्ताहर) -रांजणगाव गणपती येथील दर बुधवारी भरणारा आठवडे बाजार बुधवार (दि. 18) बंद ठेवण्यात येणार असल्याचे सरपंच सर्जेराव खेडकर यांनी सांगितले. नागरिकांनी आरोग्य विषयक काही अडचणी असल्यास रांजणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. तसेच कुणीही करोना संदर्भात अफवा पसरवू नये अथवा अफवांना बळी पडू नये, असे आवाहन सरपंच सर्जेराव खेडकर यांनी केले आहे.
तरकारी उत्पादक कोलमडला
आगोदर अति पाऊस मग लहरीवातावरण अन् आता करोना या तिहेरी कात्रीत बळीराजा अडकला असून आम्ही जगावे तरी कसे असे म्हणण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी आठवडे बाजार रद्द होत असल्याने तरकारी उत्पादक हवालदिल झाले आहेत. आठवडे बाजारात पालेभाज्या, फळभाज्या खरेदीसाठी व्यापारी, छोटे-मोठे ग्राहक कायम येत असतात मात्र, करोनामुळे सध्या आठवडे बाजार बंद ठेवले जात असल्याने हा माल कुठे पाठवायचा कसा असा प्रश्न आता बळीराजाच्यासमोर आवासून उभा असून उत्पादन खर्चही हातात पडणार नसल्याने तो चिंताग्रस्त झाला आहे.