मुखवासार्थे पुगीफल तांबुलं समर्पयामि। असे म्हणून देव-देवतांना विविध पूजेमध्ये विडा अर्पण करणाचा एक उपचार आहे. साधारणपणे देवास पूजेनंतर नैवेद्य दाखवून झाला की विडा अर्पण केला जातो. पूजाविधीमध्ये जो विडा देवास अर्पण केला जातो त्यात दोन विड्याची पाने त्यावर सुपारी एखादे नाणे, बदाम, खारीक, खोबरे, हळकुंड आणि एखादे फळ असे ठेवून तो विडा देवास त्यावर तुळशीच्या पानाने पाणी सोडून अर्पण केला जातो. यालाच देवास तांबूल दक्षिणा अर्पण करणे असे म्हणतात.
कार्तिक महिन्यात देव मंदिरातून चालत असलेल्या काकड्याच्या पूजेमध्येही ह्या विड्याचा उपचार येतो. त्याबाबत प्रसिद्ध असलेली विडा घ्या हो नारायणाऽऽ ही रचनाही आपल्याला चांगलीच ठाऊक आहे. विड्याला धार्मिकते बरोबरच वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक असेही महत्त्व आहे. भोजन हा माणसाच्या दैनंदिन कार्याचा एक भाग आहे. भोजनाचेही आपल्या संस्कृतीने एक वेगळे शास्त्र ठरवून दिलेले आहे. भोजनानंतर भोजन कर्त्यास विडा दान दक्षिणा देऊन संतुष्ट करावे, असा अतिथीधर्म आपल्या संस्कृतीने सांगून ठेवला आहे.
विडा हा आपल्याला जो जास्त परिचित आहे, तो जेवणानंतर दिला जाणारा वा खाल्ला जाणारा विडा ह्यालाच पान खाणे असेही म्हटले जाते. जेवणानंतर विडा खावा कारण त्यातील पाचक रस अन्नपचनास पोषक असतो. विड्याच्या पानाचे अनेक वेगवेगळे प्रकार असून त्यात वापरले जाणारे घटक पदार्थ वेगवेगळे असतात. मिठा पान, बनारसी पान, गोविंद विडा अशी काही पानांची नावे आपल्या परिचयाची आहेत. पान तयार करणे, पान लावणे ह्या सुद्धा एक कौशल्याच्या गोष्टी झाल्या आहेत. पानाची विक्री हा तर एक व्यवसाय झालेला आहे. बोलीभाषेत त्याचा उल्लेख पानाची टपरी, पानाचा ठेला असा केला जातो.
विड्याचा आणखी संदर्भ वाचायला मिळतो, तो म्हणजे ऐतिहासिक कथा आणि कादंबऱ्यांतून, एखादी गोष्टही पैजेवर करण्यासाठी पैजेचा विडा उचलला, असे संदर्भ वाचायला मिळतात. अशा प्रकारचा पैजेचा विडा उचलणे म्हणजे एक प्रकारचे शक्तिसामर्थ, कलाकौशल्य ह्यांना उघड उघड दिलेले आव्हान असते. असे आव्हान उचलणाऱ्यांसाठी ते आव्हान पेलण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते. सर्वकौशल्य पणास लावावे लागते. प्रसंगी जीवाची बाजीही लावावी लागते. अशा प्रकारे विडा हा मानवी जीवनातला एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे.
– अरुण गोखले