मुंबई : नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक ऑक्टोबरमध्ये होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतर देगलूरमधील शिवसेनेचे नेते माजी आमदार सुभाष साबणे हे भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे नांदेडमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. भाजपाने देगलूर बिलोली जागेसाठी सुभाष साबणे यांना उमेदवारी देखील जाहीर केली आहे. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
“ते शेतकऱ्यांचे दुखः समजू घ्यायला गेले होते की नांदेडला जाऊन शिवसेनेचे माजी आमदारांना पक्षात घ्यायला गेले होते हे लोकांना कळलं आहे. गेली अनेक वर्ष ते काँग्रेस, राष्ट्रवादीचे लोक घेत होते. भाजपाकडे स्वतःचे काही नाही. निवडणूक लढण्यासाठी त्यांनी आमचा माणूस घेतला तोही रडका. शिवसैनिक हा परिस्थितीच्या विरुद्ध रडत नाही लढतो. रडणाऱ्यांना शिवसेनेत स्थान नसतं. पळपुट्यांना शिवसेनेत स्थान नसतं. पण भाजपाने हे काही नविन धोरण सुरु केलं आहे स्वतःचे काही नसल्यामुळे दुसऱ्यांची लोक घ्यायचे. हे फार काळ चालत नाही,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
नांदेडमधील शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी शिवसेनेला सोडचिट्ठी देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय का घेतला याविषयी बोलताना सुभाष साबणे यांना रडू कोसळलं. साबणे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक होणार होती त्या दिवशी विधानसभेत तोडफोड केल्याची आणि त्यासाठी वर्षभर निलंबित झाल्याची आठवण सांगितली.
“मी आजही शिवसैनिक आहे. ४ ऑक्टोबरनंतर जो काही निर्णय आहे तो होईल. माझ्या शिवसैनिकाचा अपमान झाला. पोलिसांनी बुटासह तुडवलं. अशोक चव्हाण यांनी बॅनरवर माझ्या नेत्याचा कधीच फोटो छापला नव्हता. बॅनरवर महाविकासआघाडीच्या नेत्याचे फोटो राहावेत. माझ्या मतदारसंघात येताना महाविकासआघाडीचे नेते म्हणून आघाडीतील घटक पक्षाला सोबत घेऊन आलं पाहिजे. तुम्ही पक्षाचा कार्यक्रम राबवायला नको हीच आमची भूमिका होती. त्यामुळेच आम्ही काळे झेंडे दाखवत होतो. तर पोलिसांनी पकडून बुटासह कार्यकर्त्यांना मारलं,” असे मत सुभाष साबणे यांनी म्हटले.
नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोविडनंतर १० एप्रिल रोजी निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपाने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांचा पक्षप्रवेश होण्याआधीच त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडीसाठी हा धक्का मानला जात आहे.