गायत्री वाजपेयी
पुणे – नव्या युगातील युद्धाचे स्वरूप बदलले आहे, या काळात केवळ पारंपरिक रणनीती आत्मसात करायची नसते, तर नव्या रणनीतीतही तितकेच निपुण असणे गरजेचे आहे, तसे झाले नाही तर आपल्याला किती मोठे नुकसान सहन करावे लागते याची प्रचिती नुकतीच भारत-चीन यांच्यामधील संघर्षात पाहायला मिळते आहे. दोन्ही देशांच्या सैन्यात नुकत्याच झालेल्या चकमकीनंतर माहितीयुद्धात चीनची आघाडी आणि भारताकडे असलेली आक्रमतेची कमतरता यातून भारतीय प्रशासन आणि संरक्षण सक्षमता या दोन्हींबाबत साशंकता निर्माण होत आहे.
युद्धात सैन्याचे मनोबल तोडायचे असेल तर सर्वात आधी त्या सैन्याच्या सेनापतीला मारा म्हणजे सैन्य आपोआपच कमकुवत होईल. या युद्धनीतीतील एक महत्त्वाचा मानसशास्त्रीय तर्क मानला जातो. इतिहासातील अनेक लढायांमध्येदेखील अशी उदाहरणे आपण वाचली आहे. मात्र, या समजाला भारतीय सैन्य दलाच्या बिहार रेजीमेंटच्या जवानांनी छेद देत, सैन्य म्हणजे केवळ त्याचा प्रमुख नसतो, तर सैन्याचा प्रत्येक जवान हा तितकाच सामार्थ्यवान असतो याची प्रचिती दिली.
लडाख येथे 15 जूनला चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले तर काही जखमी झाल्याचे वृत्त समोर आले. लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लडाख येथील गलवान खोऱ्यातील सीमेवर एका ठिकाणी चिनी सैन्यांनी अनधिकृतपणे तंबू उभारला होता. चिनी सैन्यांनी तो तंबू रिकामा करावा, याबाबत बोलणी करण्यासाठी गेलेल्या भारतीय सैन्याचे कर्नल बी. संतोष बाबू जे तेथील सैन्य तुकडीचे प्रमुख होते, त्यांची चिनी सैनिकांनी निर्घृण हत्या केली. तसेच, अन्य जवानांनाही क्रूरपणे मारहाण केली. शत्रू सैन्याच्या प्रमुखाला मारले म्हणजे त्या सैन्याचे मनोबल खालावते, अशा स्थितीत शत्रू सैन्याला हरविणे अधिक सोपे जाते, असा समज चिनी सैन्यांमध्ये होता. मात्र, हाच समज सैन्याच्या बिहार रेजीमेंटच्या जवानांनी खोडून काढला. चिनी सैन्यांनी आपल्या प्रमुखांना (कमांडिंग ऑफिसर) मारल्याचे समजताच, इतर जवान शत्रूवर तुटून पडले.
दोन्ही देशांच्या सैन्यात झालेल्या जोरदार हाणामारीत दोन्हींकडील बरेचसे जवान शहीद झाले. यामध्ये आपल्या सैन्यातील 20 जवान शहीद झाले. तर, चीनचे सुमारे 35 जवान शहीद झाल्याचे अमेरिकन गुप्तचर संस्थेकडून सांगितले जात आहे. मात्र, या हिंस्र चकमकीतही भारतीय सैन्याच्या जवानांनी शौर्य गाजवत चिनी सैन्याला चांगला धडा शिकवला. ही त्या सैन्य तुकडीची आणि सैन्यदलाची यशोगाथाच होती; परंतु प्रशासकीय समन्वयाअभावी आणि माहिती युद्धातील आक्रमतेतील कमतरतेमुळे या यशोगाथेला योग्य न्याय देण्यास भारत कमी पडला. याउलट भारतीय प्रशासन आणि आधुनिक युद्धसज्जता यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, ते कसे हे समजून घेऊ.
माहिती आणि मानसशास्त्रीय युद्ध….
21 व्या शतकात माहितीयुद्ध आणि मानसशास्त्रीय युद्ध याला मोठे महत्त्व आहे. या काळात विविध माध्यमांचा वापर करत, एखाद्या गोष्टीबाबत समोरच्याचे मत पक्के करणे म्हणजेच परसेप्शन मॅनेजमेंट हा युद्धातील एक महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये जो समुदाय मागे पडतो त्याच्या विश्वासार्हतेबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. हीच गोष्ट भारताच्या बाबतीतही पाहायला मिळाली. 15 जूनला झालेल्या चकमकीची पहिली माहिती समोर आली ती 16 जूनला दुपारी सुमारे साडेबारा वाजता. यामध्ये गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैन्यात झडप झाली असून त्यामध्ये भारतीय सैन्याचे एक वरिष्ठ अधिकारी आणि तीन जवान शहीद झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर लागोपाठ या घटनेबाबत सखोल माहिती मिळविण्यासाठी सर्वच क्षेत्रांतून प्रयत्न केले जाऊ लागले. माध्यमे, समाजमाध्यमे सर्वच स्तरांवर सविस्तर माहितीची विचारणा होऊ लागली. मात्र, या घटनेनंतर तब्बल दहा तासांनंतर रात्री 10:30 वाजता सैन्याकडून नवीन माहिती देण्यात आली आणि त्यात शहीद जवानांची संख्या 20 असल्याचे सांगण्यात आले.
आक्रमकता कमी पडत आहे : लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर (नि.)
या माहिती युद्धाबाबत लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर (नि.) म्हणतात की, चीन, अमेरिका, इस्राइल हे देश माहितीयुद्धात अग्रेसर आहेत. अशाप्रकारच्या युद्धासाठी प्रचंड पैसा खर्च करण्याची त्यांची ताकद आहे. एका इंग्रजी म्हणीनुसार, अतिशय पद्धतशीरपणे बोललेले असत्यदेखील काही काळानंतर सत्य वाटू लागते. हीच बाब आताच्या परिस्थितीला लागू पडते. आशिया खंडातील आपल्या बरोबरीचा एकमेव देश असलेल्या भारताला जर आपण थोपवू शकलो, तर आपल्या आजूबाजूच्या तैवान, तिबेट, अफगानिस्तान, तुर्कस्तान यांसारख्या इतर देशांनाही एकप्रकारे धडा शिकवू, या विचारातून सध्या चीन भारताविरोधात कुरापती करत आहे. तसेच, करोना उद्रेकानंतर निर्माण झालेल्या जागतिक असंतोषामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत भारताने चीनविरोधात कठोर पावले उचलू नयेत, हाही यामागील महत्त्वाचा मुद्दा आहे. या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी पारंपरिक युद्धाबरोबरच माहिती आणि मानशास्त्रीय युद्धातही चीनने आक्रमक मार्ग अवलंबला आहे. दुर्दैवाने आपल्याकडील गृह, परराष्ट्र आणि संरक्षण य महत्त्वपूर्ण मंत्रालयात असलेल्या समन्वयाच्या अभावामुळे या युद्धात आपली आक्रमकता कमी पडत आहे. जे भारतासाठी घातक ठरेल.
सक्षमतेबाबत आढावा घेण्याची गरज…
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दोन वेळा अधिकृत पत्रकाद्वारे हा वाद भारतीय सैन्याच्या घुसखोरीमुळे झाला असून, पूर्णपणे भारत जबाबदार असल्याचा दावा केला. तसेच, गलवान खोऱ्याचा प्रदेश हा चीनचा भाग असल्याचे अधोरेखित केले. मात्र, चीनच्या दाव्यावर भारताकडून कोणतेही ठोस उत्तर देण्यात आले नाही. त्यानंतरही अनेकवेळा चीनकडून भारतावर दोषारोप करण्यात आले आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत पुन्हा एकदा गलवान प्रदेशावर दावा करण्यात आला. दरम्यानच्या काळात भारतीय सैन्याचे काही जवान चिनी सैन्याच्या ताब्यात असल्याचेही वृत्त समाजमाध्यमांवर पसरू लागले. एकूणच चीनकडून भारताविरुद्ध एक माहितीयुद्ध खेळले जात होते आणि या युद्धातील आक्रमतेअभावी भारत या युद्धाला बळी पडत असल्याचे सातत्याने दिसून आले. या घटनेने भारताला माहिती युद्ध आणि मानसशास्त्रीय युद्धातील आपल्या सक्षमतेबाबत आढावा घेण्याची गरज निर्माण केली आहे