देहुरोड – देहुरोड कॅंटोन्मेंट हद्दीतील शितळानगर, थॉमस कॉलनी, डॉ. आंबेडकर रोड, गांधीनगर, मुख्य बाजारपेठ, भाजी मंडई, अबूशेठ मार्ग तसेच चिंचोली, किन्हई, झेंडेमळा, काळोखे मळा परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट, बाहुबली मंदिर, रायगड किल्ल्याची प्रतिकृती, जिवंत देखावे विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी सादर केले आहेत. यावर्षी काही मंडळे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उत्सव साध्या पद्धतीने साजरा करीत आहेत.
महात्मा फुले अखिल भाजी मंडई मंडळाचे यंदा 34 वे वर्ष असून, 70 फूट उंच व 35 फूट रुंदीचा बाहुबली मंदिराचा देखावा सादर केला आहे. मंडळाचे अध्यक्ष दिगंबर चौरे, बिट्टू लांगे, अरूण सरोदे, उमेश जैन आदींनी परिश्रम घेतले. गुलाल, भंडाऱ्याचा वापर न करता फुलांची मुक्त उधळण करीत पारंपारिक वाद्यांवर मिरवणूक काढण्याचे मंडळाचे नियोजन आहे. मुख्य बाजार पेठेतील वैश्य समाज मंदिर येथील सुदर्शन मंडळ यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहेत. मंडळाने यंदा 80 फूट रुंद व 40 फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा “रायगडचा किल्ला’ हा देखावा साकारला आहे. किल्ल्यावर तोफ, मावळे यांसह विद्युत रोषणाई केली असल्याने देखावा गर्दी खेचत आहे.
देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक विशाल खंडेलवाल मंडळाचे अध्यक्ष असून, राहुल अगरवाल, अमित शर्मा, सुनील अगरवाल, गिरीराज शर्मा, महिला कार्यकर्त्यांच्या सहकार्याने पदाधिकारी आदींनी संयोजन केले. मंडळाच्या वतीने आरतीला येणाऱ्या मुलांना व महिलांना भेट वस्तू, रक्तदान शिबिर, नेत्रदान, आरोग्य तपासणी शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हनुमान तरुण मंडळाचे हे 49 वे वर्ष आहे. यंदा साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात येत आहे. सूर्यकांत सुर्वे हे अध्यक्ष आहेत. अबूशेठ रस्त्यावरील अजिंक्य मित्र मंडळाने आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. सुनील गांधी हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.
अष्टविनायक मित्र मंडळाचे 29 वे वर्षे असून, साध्या पद्धतीने सजावट करीत गणेश मंदिर साकारले आहे. न्यू गोल्डन ग्रुपने मंडळाचे 26 वे वर्ष आहे. लोकमान्य टिळक मित्र मंडळाने विद्युत रोषणाई करून सजावट केली आहे. गांधीनगर येथील श्री गणेश मित्र मंडळाचे 39 वर्ष असून, अध्यक्ष चंद्रशेखर मारीमुत्तू यांनी कोल्हापूर-सांगली पूरग्रस्थांना मदत करणार असल्याने मंडळाने यावर्षी फुलांच्या आकर्षक सजावट करून गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. व्यंकटेश मारीमुत्तू, अमरीश धोत्रे, शंकर मारीमुत्तू आदींनी परिश्रम घेतले. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष, आरोग्य समितीचे अध्यक्ष, नगरसेवक हाजीमलंग मारीमुत्तू मंडळाचे संस्थापक आहेत.
विशाल मित्र मंडळाचे 34 वे वर्ष असून, अध्यक्ष राजू मारीमुत्तू, प्रशांत पवार, अलोक शर्मा आदींनी आकर्षक सजावट करून “श्रीं’ची प्रतिष्ठापना केली आहे. विद्यार्थी, महिला व मुलींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. डॉ. आंबेडकर रस्त्यावरील बंधुत्व मित्र मंडळाने गणरायाची मूर्तीची आकर्षक सजावट केली आहे. नवशक्ती चैतन्य मित्र मंडळाचे 43 वे वर्ष असून, मंडळाने संगीताच्या तालावरील विद्युत रोषणाई केली आहे. दिनेश श्रीवास हे अध्यक्ष आहेत.
चिंचोलीतील साईनाथ मित्र मंडळाने वर्गणी जमा न करता सभासदाच्या माध्यमातून गणेश उत्सव साजरा करीत आहे. शाडू मातीची पर्यावरण पूरक मूर्ती प्रतिष्ठापना केली. विद्युत रोषणाई करीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
आदर्श मित्र मंडळाचे 31 वे वर्ष असून, मंडळाने द रिअल डायमंड ग्रुपच्या सहकार्याने कोल्हापूर-सांगली परिसरातील पूर परिस्थितीवर आधारित “काळ’ हा जिवंत देखावा सादर करीत पूरस्थितीचे वास्तव चित्र मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचे अध्यक्ष सचिन पानसरे, विजय पानसरे यांनी सांगितले. हनुमान व्यायाम मंडळाचे 59 वे वर्ष असून, मंडळामार्फत वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. तसेच मंडळाने अनावश्यक खर्चाला फाटा देत फुलांची सजावट केली आहे. रुपेश जाधव हे मंडळाचे अध्यक्ष आहेत. भैरवनाथ तरुण मंडळाने दत्तमंदिराजवळ सजावट करून गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. मंडळाचे 66 वे वर्ष आहे.
श्रीकृष्ण मित्र मंडळ ढोल-ताशा पथकाचे हे 22 वर्ष असून, यंदा मंडळाने “धबधबा’ हा आकर्षक देखावा सादर केला आहे. अनिकेत अनिल दाभाडे हे अध्यक्ष आहेत. भेगडे आळी भागातील जय भवानी मंडळाने “बैलगाडीत बसलेले गणेश’ हा देखावा सादर केला आहे. कामगार नेते संदीप भेगडे मंडळाचे अध्यक्ष आहेत. नवयुग मित्र मंडळाने सजावट केली. किरण थापमान हे मंडळाचे अध्यक्ष आहेत. बालगणेश मित्र मंडळाने “हिमालयाची प्रतिकृती’ त्यावर शिवलिंग उभारले आहे. विकास साह हे मंडळाचे अध्यक्ष आहेत. शिवतेज मित्र मंडळाने फुलांची सजावट करून विद्युत रोषणाई
केली आहे. किन्हई, झेंडेमळा व काळोखेमळा परिसरातील विविध मंडळांनी फुलांची सजावट व विद्युत रोषणाईवर भर देत गणेशोत्सव साजरा केला आहे. इंद्रायणी मित्र मंडळाने फुलांची सजावट केली आहे. बुवासाहेब प्रतिष्ठानच्या वतीने पूरग्रस्तांना मदतीसाठी उत्सव साधेपणाने साजरा
करीत आहेत.
किन्हईतील गजानन मित्र मंडळ, गुरुदत्त मित्र मंडळ, गणेश मित्र मंडळ, शिवतेज मित्र मंडळ, ग्रामविकास मंडळ तसेच झेंडेमळा येथील ओम साई मित्र मंडळाने पूरग्रस्तांना मदत दिली आहे. तसेच यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला आहे. काळोखे मळा येथील जगद्गुरू मित्र मंडळाने उत्सव साजरी करीत आहेत. मोहन काळोखे हे अध्यक्ष व दिलीप काळोखे उपाध्यक्ष आहेत.