शारीरिक अंतर नियमाचा नागरिकांना विसर
पुणे – लॉकडाऊनमुळे अडकलेल्या श्रमिक, पर्यटक, विद्यार्थी आदींना त्यांच्या मूळगावी सोडण्यासाठी श्रमिक विशेष गाड्या सोडण्यात येत होत्या. मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून 77 हून अधिक गाड्या सोडल्या असून, यातून जवळपास 1 लाखांहून अधिक नागरिक घरी परतले. मात्र, अद्यापही स्थानक आवारामध्ये परप्रांतीयांची गर्दी होत असून, अनेक ठिकाणी शारीरिक अंतराच्या नियमाचा नागरिकांना विसर पडल्याचे चित्र आहे.
पुणे आणि आसपासच्या परिसरामध्ये अडकलेल्यांना श्रमिक विशेष गाडीने मूळगावी पाठवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यामध्ये जिल्हा प्रशासनाकडे नोंदणी केलेल्या नागरिकांना पाठवण्यात येत आहे.
गुरुवारीदेखील प्रशासनाकडून पाचपेक्षा अधिक गाड्या सोडण्यात आल्या. यासाठी शहराच्या विविध भागांतून नागरिकांना पीएमपीच्या बसेसमधून स्टेशनपर्यंत सोडण्यात आले. स्टेशनच्या आवारात केवळ पोलिसांचा बंदोबस्त असणाऱ्या ठिकाणीच नागरिक योग्य अंतर ठेवून वावरत होते. मात्र, काही ठिकाणी नागरिक घोळका करून बसल्याचे चित्र गुरुवारी स्थानक परिसरामध्ये होते.
प्रवासादरम्यान नागरिकांनी वारंवार शारीरिक अंतर ठेवणे गरजेचे असून, चेहऱ्यावर मास्क, फेसशिल्ड लावावे, कोचमध्ये स्वच्छता ठेवावी, असे आवाहनदेखील प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
पुणे विभागातून धावल्या 77 रेल्वे
7 ते 21 मे या कालावधील पुणे विभागातून 77 हून अधिक गाड्या धावल्या, त्यापैकी केवळ पुणे स्टेशनहून 39 श्रमिक विशेष गाड्या सोडल्या. यामध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, तमिळनाडू, झारखंड, जम्मू, मणिपूर आदी राज्यांचा समावेश आहे. याद्वारे 50 हजारांहून अधिक नागरिकांनी प्रवास केला. या गाड्या धावण्यापूर्वी गाड्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत असून पाणी, वीज, पंखे आदी आवश्यक सुविधांची पाहणी प्रशासनाकडून करण्यात येत आहे. याशिवाय, प्रशासनाकडून फूड पॅकेटदेखील देण्यात येत आहेत. विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली या गाड्यांचे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.