कृषी, महसूल विभागाकडून पंचनामे पूर्ण : 29 हजार 173 शेतकऱ्यांनी मागितली नुकसान भरपाई
बारामती – बारामती तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे महसूल व कृषी विभागाने पूर्ण केले आहेत. 29 हजार 173 शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई मागितली आहे. बारामती तालुक्यातील 117 गावांतील 17 हजार 229 हेक्टर शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे वास्तव पंचनाम्यातून समोर आले आहे. तालुक्यात उसाच्या लागणीचे नुकसान सर्वाधिक झालीे आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी तत्काळ मदतीची गरज निर्माण झाले आहे. सरकारने याबाबत त्वरित निर्णय घेऊन तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
बारामतीतील बागायती भागात जूनच्या सुरुवातीला काही प्रमाणात पाऊस झाला होता. मात्र, जिरायती भागाकडे नेहमीप्रमाणे वरुणराजाने पाठ फिरवली होती. त्यामुळे ऐन पावसाळ्यात जिरायती भागात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता तर अनेक भागात पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरू होती. जून, जुलै, ऑगस्टमध्येही पावसाने पाठ फिरवल्याने सलग पाचव्या वर्षी दुष्काळाचे सावट पडले असल्याने पश्चिम भागातील जनावरे जगवणे शेतकऱ्यांना अवघड झाले होते, त्यामुळे चारा छावण्यांना मुदतवाढही दिली होती.
मात्र, सप्टेंबर महिन्यात वरुणराजाने संपूर्ण बारामती तालुक्यावर कृपा केली अन् बरसण्यास सुरुवात केली. त्यामुळे बळीराजा आनंदीत झाला होता. तर या पावसाने आपले आधीचे सर्व विक्रम मोडीत काढले त्यामुळे कऱ्हा नदी तब्बल पाच वर्षांनंतर खळखळली तर नीरा नदीलाही अनेक वर्षांनंतर पूर आला होता. तर ज्या शेतकऱ्यांनी खरिपातील पिके घेतली होती, त्यांना संजीवनी मिळाली होती; त्यामुळे यंदा भरघोस उत्पादन येण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र, परतीच्या पावसाने घातलेल्या धुमाकूळाने होत्याचे नव्हते केले. अन् पाच वर्षांनंतर मिटलेल्या कोरड्या दुष्काळाची जागा ओल्या दुष्काळाने घेतली. त्यामुळे आधी कोरड्या तर आता ओल्या दुष्काळाने बळीराजाला मारले, असे म्हणण्याची वेळ
आली आहे.
“खुर्ची’च्या खेळात अडकली मदत –
अतिवृष्टीने पिके आडवी झाली आहेत. शेतकरी कोसळला आहे, अशावेळी बळीराजाचे अश्रू पुसण्याऐवजी चारही महत्त्वाचे पक्ष केवळ सत्ताकारणात मश्गूल असतान राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यामुळे राज्याला सध्यातरी कोणी वालीच उरलेला नाही. त्यामुळे केवळ बांधावर जात. शेतकऱ्यांना धीर देणारे राजकारणे या भयाण स्थितीतही “खुर्ची’साठी एकमेकांवर कुरघोडी करण्यात मग्न आहेत. त्यामुळे अशा पक्षांना खरोखरच राजकारण करण्याचा अधिकार उरतो का, असा प्रश्न उपस्थित होतो.
दरम्यान, आता राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यातच महा”शिव’आघाडीचा निर्णय न झाल्यास पुढे काय? अन् तोपर्यंत बळीराजा अन् सामान्य नागरिक वाऱ्यावर का? असे एक अनेक प्रश्न सध्या निर्माण झाले आहेत. तर बळीराजाला उभारी देण्यासाठी नुकसानभरपाई जाहीर केली आहे; मात्र, या सत्तापेचात ती अडकली असल्याने ती तत्काळ मिळणार का? की त्यासाठी किती प्रतिक्षा करावी लागणार, असे प्रश्न बारामती तालुक्यातील बळीराजाने उपस्थित केला आहे.
भरपाई की…
13 मे 2015 निर्णयानुसार बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 19 कोटी रुपयांची मदत होणार की जादा होणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे. कारण अतिवृष्टीमुळे बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळावी, अशी शेतकऱ्यांची
मागणी आहे.
बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे पूर्ण झाले असून शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बारामती तालुक्यात 17 हजार 229 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या याद्या बनवण्याचे काम सुरू आहे. याद्या बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांना पिकांच्या वर्गवारी व शासनाच्या धोरणानुसार मदत लिहून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
– विजय पाटील, तहसीलदार, बारामती
बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तालुक्यातील सखल भागात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चारा पिकापासून ते फळबागपर्यंत सर्व पिकांचे पंचनामे करण्यात आले आहेत. नुकसानभरपाईतून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात आले आहे. दोन ते तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या याद्या पूर्ण होतील त्यानंतर प्रत्यक्ष मदतीला सुरुवात होईल.
– दत्तात्रय पडवळ, कृषी अधिकारी, बारामती तालुका
1. काऱ्हाटी :पावसाने विश्रांती घेतली तरी अद्याप शेतातील पाण्याचा निचरा झालेला नाही.
2. काऱ्हाटी :अतिपावसामुळे ज्वारीचे पीक खालून सडले असल्याचे दाखवताना शेतकरी.
3. माळवाडी :गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने कांदा पिकावर औषध फवारणी करताना शेतकरी.
4. काऱ्हाटी :ओढ्यालगत असलेल्या बाजरी पिकात अद्यापही पाणी साचून असल्याचे दाखवताना महिला शेतकरी.