चिंबळी -गेल्या दोन दिवसांपूर्वी इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली; परंतु या नदीच्या पाण्याच्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील चिखली, तळवडे परिसरातील औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी आणि ऑईल मिश्रित पाणी इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पात्रात थेट सोडले जात आहे.
मोशी-चिंबळी हद्दीत असलेल्या इंद्रायणी नदीच्या केटी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस पूर्णपणे पांढरा शुभ्र साबणासारखा फेस निर्माण झाला असून, मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे, यामुळे रब्बी हंगामातील कांदा, ज्वारी, गहू आदी पिकांवर या दूषित पाण्याचा परिणाम होणार असल्याचे, चिंबळी, कुरूळी, मोशी, डुडुळगाव, केळगावं भागातील शेतकरी वर्गांनी सांगितले आहे.
पुणे जिल्ह्यात खेड व हवेली तालुक्यातील श्रीक्षेत्र आळंदी ते देहू या तीर्थक्षेत्रातून वाहत असलेल्या इंद्रायणी नदीच्या पात्रात पाण्याची वाढ झाली असल्याने शेतीसाठी या पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असून, चिंबळी-मोशी हद्दीतील इंद्रायणी नदीवर बटवाल वस्ती येथे महाराष्ट्र सरकारने गेल्या चाळीस वर्षांपूर्वी बांधण्यात असलेल्या केटी बंधारा या परिसरातील शेतकरी वर्गाना मोठ्या प्रमाणात शेतीसाठी फायदा झाला असून, ते बारमाही विविध पिकांचे उत्पन्न घेत आहेत. मात्र, सध्या या भागात दूषित पाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे.