परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान
दिवाळीत शेतकऱ्यांच्या घरी पणती पेटू शकली नाही
सोमेश्वरनगर (प्रतिनिधी)– बारामती तालुक्यात परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उसासह मका, कांदे, बाजरी या पिकांचे नुकसान झाले असून सोयाबीन, भुमीमुग, बाजरी ही काढणी केलेली पिकं मातीमोल ठरली आहेत. पावसाने बहुतांश घरांची पडझड झाल्याने यंदाच्या दिवाळीत शेतकऱ्यांच्या घरी पणती पेटू शकली नाही.
बारामती तालुक्यात परतीचा पाऊस कोसळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दोन दिवसांपूर्वी दिवसभर धुक्याचे वातावरण होते. परंतु, बुधवारी (दि.30) अचानक ढगाळ वातावरण होत पावसाने हजेरी लावली. काही शेतकऱ्यांची काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सुरुवातील पिके पेरणीच्या वेळी पावसाने उशीर केल्याने पिकांच्या उत्पादनात घट झाली तर आता काढणीला आलेली पिके पावसात भिजत असून बाजरीही मातीत गेल्याने हक्काचे पीकही शेतकऱ्याच्या हातातून गेले आहे. कांदे पाण्याने खराब होत असल्याने ते टाकून द्यावे लागणार आहेत, अशा आसमानी संकटामुळे शेतकरी पूर्णत: हतबल झाला आहे.
याबाबत प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी चौधरवाडीतील शेतकरी महेंद्र संपतराव पवार यांनी केली आहे. तर, एक महिन्यापूर्वी काढणीला आलेले बाजरी पीक सोडून दिले होते. ते सध्या शेतातच कुजलेल्या अवस्थेत असताना पावसाला जोर आल्याने शेतकामी रखडली असल्याचे भाऊसो भगवान दगडे यांनी सांगितले. कांदा पीकाची परतीच्या पावसामुळे माती झाली आहे. शोतात पाणी साचत असल्याने पीकही कुजून गेले असल्याचे धन्याकुमार भापकर यांनी सांगितले. शेतातील ऊस पिकात पावसाने पाणी साचल्याने उसाच्या सऱ्या पूर्णतः भरलेल्या आहेत त्यामुळे लागवडीचा ऊस कुजलेल्या स्वरूपात दिसत असल्याचे महेंद्र संपतराव पवार यांनी सांगून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.