खासदार डॉ. विखे पाटील व माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे गाऱ्हाणे
नगर (प्रतिनिधी) – नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2017-18 आणि 2018-19 ह्या दोन आर्थिक वर्षात पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत पीक विमा विम्याची रक्कम खात्यात जमा झाली नाही. त्यामुळे संबंधित विमा कंपनीला आवश्यक त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केंद्रीय कृषिमंत्री तथा ग्राम विकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्याकडे केली.
विखे पाटील व कर्डिले यांनी कृषीमंत्री तोमर यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या वतीने बॅंकेचे संचालक म्हणून कर्डिले व खासदार डॉ. विखे पाटील यांनी रखडलेल्या पीक विम्याबाबत मंत्र्यांचे लक्ष वेधले. यापूर्वी केंद्रीय स्तरावर केलेल्या पाठपुराव्यामुळे नगर जिल्ह्यातील 1 लाख 69 हजार 27 शेतकऱ्यांना 144 कोटी रुपयाचा पिक विमा मिळाला.
ती रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. त्याबद्दल खासदार डॉ. विखे पाटील यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. मात्र, आता नगर आणि राहता तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप 2017 -18 आणि 2018-19 ची विमा रक्कम कतांत्रिक कारणामुळे जमा झाली नसल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी संबंधित विमा कंपनीस सूचना देण्याची विनंती त्यांनी केली. तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन कृषीमंत्री तोमर यांनी दिले.