मुंबई – आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर पडदा पडला. दोघांमधील वाद आता पूर्णपणे क्षमेला असे वाटत असतानाच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून या प्रकरणावर निशाणा साधण्यात आला आहे. काळाने सूड घ्यायला सुरुवात केली आहे. सत्य हे ‘कडू’च असते. त्याला कोण काय करणार ? अशा शब्दातून सामनातून जोरदार टोलेबाजी करण्यात आली आहे.
रवी राणा हे फडणवीस यांना मानणारे आमदार आहेत व ते पक्के हनुमान भक्त आहेत. हनुमानाचा भक्त खोटे बोलेल काय ? एकवचनी, सत्यवचनी रामाचा भक्त बजरंगबली रामाचे नाव घेऊन खोटे कसे बोलू शकेल ?”असा सवाल सामनातून उपस्थित करण्यात आला आहे. राणा यांचा राम कोण व बोलविता धनी कोण ? याचा शोध कडू यांनी घेतला तर सत्याचा पट उलगडला जाईल असंही सामनात म्हंटल आहे.
“आता कितीही दिलगिरीचा मुलामा देऊन राणा यांनी माघार घेतली असली तरी या हनुमान भक्ताने आधी जे पन्नास-पन्नास खोक्यांचे सत्य जाहीर केले, ते काय त्यांच्या श्रीरामाची मान्यता असल्याशिवाय ? उद्या खोकेवाल्यांच्या घरात नाते जुळवायचे म्हटले तरी लोक मागे हटतील. काळाने सूड घ्यायला सुरुवात केली आहे. सत्य हे ‘कडू’च असते. त्याला कोण काय करणार ? अशी शाब्दिक फटकेबाजी सामनामधून करण्यात आली आहे”.