मुंबई – शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी रविवारी दावा केला की, भारत जोडो यात्रेमुळे महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघाले, पण त्या यात्रेस सावरकर यांच्यावरील टीकेमुळे नाहक गालबोट लागले आहे. पक्षाच्या मुखपत्रातील ‘रोखठोक’ या साप्ताहिक स्तंभात, संजय राऊत यांनी हे प्रतिपादन केले आहे.
ते म्हणाले की, लोकांच्या भावना दुखावतील असे विषय राहुल गांधी यांनी उपस्थित करण्याचे कारण नाही, त्यामुळे भाजपला लोकांचे या यात्रेवरील लक्ष विचलीत करण्याची संधी मिळत आहे. सावरकर यांच्यावरील टीकेमुळे भाजप रस्त्यावर उतरला असला तरी ते त्यांचे सावरकर प्रेमाचे ढोंगच आहे, संघानेही सावरकरांवर कठोर टीका केली आहे असेही राऊत यांनी निदर्शनाला आणून दिले आहे.
राहुल गांधी यांनी अलिकडेच एका पत्रकार परिषदेत सावरकर यांनी ब्रिटीशांकडे माफीनामा सादर करून अंदामानातून सुटका करून घेतल्याचे म्हटले होते. यावेळी त्यांनी सावरकरांच्या माफीनाम्याच्या प्रतिही पत्रकार परिषदेत सादर केल्या होत्या. सावरकर यांनी ब्रिटीशांना मदत करण्याचीच भूमिका घेतली होती असा दावाही राहुल गांधी यांनी केला होता. त्यामुळे मोठेच वादंग माजले होते. त्या संबंधात राऊत यांनी ही भूमिका मांडली आहे.
या स्तंभात राऊत यांनी म्हटले आहे की, मी तीन महिने तुरुंगात काढले. अनेक स्वातंत्र्यसैनिकांना आर्थर रोड तुरुंगात (मुंबईत) ठेवण्यात आले होते. तुरुंगात एक स्मारक आहे. सामान्य कैदी म्हणून तुरुंगात एक दिवसही घालवणे कठीण आहे.सावरकरांनी अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये 10 वर्षांहून अधिक काळ घालवला आणि त्यात त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. इंग्रजांनी त्यांना मनी लॉंड्रिंगच्या खोट्या आरोपाखाली अटक केली नव्हती. त्यांनी ब्रिटीश राजवटीविरुद्ध सशस्त्र क्रांतीची मशाल पेटवली आणि म्हणूनच त्यांना अंदमानला शिक्षा झाली होती असेही त्यांनी म्हटले आहे.
जन्मठेपेच्या दोन शिक्षा म्हणजे 50 वर्षे तुरुंगवास सावरकर यांना ठोठावण्यात आला होता. सावरकरांचे बंधू नारायणराव यांची बिनशर्त सुटका झाली, तर स्वतः सावरकरांना काही अटींवर सोडण्यात आले. याला दया म्हणता येणार नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे. राऊत यांनी लेखक य. दि. फडके यांच्या पुस्तकातील संदर्भ उद्धृत केला ज्यामध्ये सावरकरांच्या पत्राचा दया असा चुकीचा अर्थ लावला गेला आहे, तुरुंगातून सुटका करणे ही एक धोरणात्मक कृती होती असे फडके यांनी म्हटले होते.
सावरकरांनी ब्रिटीश सरकारला सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी नमूद केले असले तरी, ही एक धोरणात्मक चाल होती आणि ती शब्दश: घेतली जाऊ नये, असे राऊत यांनी म्हटले आहे. महात्मा गांधींनीही 26 मे 1920 रोजी यंग इंडियामधील त्यांच्या लेखाद्वारे सावरकर आणि त्यांच्या भावाची सुटका करण्याची मागणी केली होती. 1923 मध्ये कॉंग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात सावरकरांच्या सुटकेची मागणी करणारा ठरावही मंजूर करण्यात आला, असे त्यांनी म्हटले आहे.
आज अनेक नेते अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) भीतीने केंद्र सरकारला शरण जातात, पक्ष बदलतात आणि निष्ठा सोडतात. पण देशाच्या स्वातंत्र्यासाठी सावरकरांनी 10 वर्षांहून अधिक काळ अंदमान तुरुंगात कारावास भोगला आहे असेही राऊत यांनी निदर्शनाला आणून दिले आहे. सावरकरांवर टीका हा भारत जोडो यात्रेचा अजेंडा नव्हता, असेही त्यांनी म्हटले आहे.