मुंबई – एकीकडे चीनबाबत असंतोष वाढत असताना, बॉयकॉट चायना मोहीम जोर पकडत असतानाच देशाचा मानबिंदू ठरलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने चीनच्याच एका कंपनीशी करार केला. या कंपनीचा सदिच्छादूत म्हणून सचिन काम करणार असल्याने त्याच्यावर देशातील व्यापारी संघटनांनी तसेच चाहत्यांनी जोरदार टीका केली आहे. देश महत्त्वाचा की पैसा असा थेट सवालही त्याला विचारण्यात आला आहे. सचिनकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
पेटीएम या कंपनीमध्ये चीनच्या एका कंपनीची भागीदारी आहे. पेटीएम या कंपनीने आता पेटीएम फर्स्ट गेम्स हे नवे ऍप सादर केले आहे. त्यासाठी सचिनची सदिच्छादूत म्हणून नियुक्ती केल्याची माहिती याच कंपनीने जाहीर केले आहे. भारत व चीन यांच्यात सध्या प्रचंड तणाव आहे. त्याच वातावरणात सचिनने हा करार केल्याने तो पुन्हा एकदा टीकेचा धनी बनला आहे. असा स्थितीत सचिनने हा करार का केला, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. पेटीएम फर्स्ट गेम्स कंपनीकडून ट्विटरवर याबाबतचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून त्यात ही माहिती देण्यात आली आहे.
यावर संताप व्यक्त करत अखिल भारतीय व्यापारी संघटनेने सचिनला एक पत्र पाठवले आहे. चीनच्या कंपनीशी करार करू नकोस, देशभावना लक्षात घे व हा करार मोड, असे आवाहन या पत्रात करण्यात आले आहे. दोन्ही देशांमधील संबंधांत तणाव वाढल्याने बीसीसीआयलाही चीनच्या कंपनीशी आयपीएल स्पर्धेशी असलेला करार मोडावा लागला होता. हे उदाहरण ताजे असतानाच सचिन हा करार कसा करू शकतो, असा प्रश्न आता त्याच्या चाहत्यांनीही विचारला आहे.
तुझ्यासारखी देशप्रेमी व्यक्ती चीनच्या कंपनीबरोबर करार कसा करू शकते. पैशांपेक्षा देशप्रेम तुमच्यासाठीही महत्त्वाचे आहे, हे आम्हीही मान्य करतो. त्यामुळे हा करार मोडीत काढा, अशी विनंतीही सचिनला करण्यात आली आहे. यावर सचिनकडून अद्याप कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नसले तरी तो काय भूमिका घेतो याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.