कोल्हापूर – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि भाजपचे नेते तब्बल सात महिन्यानंतर घराच्या बिळातून बाहेर पडल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक स्वागत, असा जोरदार उपरोधिक टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे.
सात महिन्यानंतर घराच्या बिळातून बाहेर पडल्यानंतर कोविड सेंटरच्या आत न जाता बाहेर का असेना त्या कोरोनायोध्द्याना निदान फुलं तरी द्यायला लागले आहेत, याबद्दल त्यांचे आभारच. दरम्यान; त्यांनी आत जाऊन बघितलं असतं तर किती चांगली व्यवस्था निर्माण केली आहे, हे त्यांना कळाले असते, असेही त्यांनी म्हटले आहे.
येथील विनायक गणपतराव गाताडे यांच्यावर पुण्यातील मंगेशकर इस्पितळात उपचार करून त्यांना बरे करून आणल्याबद्दल गाताडे परिवाराने मुश्रीफ यांचा कृतज्ञतापर सत्कार केला. श्री विनायक यांच्यासह केडीसीसी बँकेचे संचालक विलासराव गाताडे, कागलचे माजी नगराध्यक्ष सुरेशराव गाताडे व या परिवारातील सदस्यांनी मुश्रीफ यांचा सत्कार केला. रांगोळ्या काढून व फुलांचा वर्षाव करीत या परिवाराने श्री मुश्रीफ यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
मंत्री मंत्री पुढे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात १७ हजार रुग्णांना रेमडीशिवर हे औषध मोफत दिले. शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने दोन हजार इंजेक्शन्स मोफत दिली.जिल्ह्यासह राज्यात आणि देशात कोरोनाचा कहर ४० टक्के कमी आला असला तरीसुद्धा मास्क, स्वच्छता व सोशल डिस्टन्स ही खबरदारी अतिशय गरजेचे आहे.
कोरोना असेपर्यंत अहोरात्र कार्यरत राहीन…..
श्री मुश्रीफ म्हणाले, गेली सात महिने कोरोना महामारीचा संसर्ग सुरू आहे. त्यापैकी अलीकडचे चार महिने तर परिस्थिती फारच गंभीर होती. कारण दररोज शंभर- दीडशे फोन यायचे.
कुणी बेड मिळवून द्या म्हणायचं, तर कुणी ऑक्सिजन -व्हेंटिलेटरचा बेड पाहिजे म्हणायचं, तर कुणी रेमडीसिवर इंजेक्शन मागायचं. या सगळ्या परिस्थितीत आपला- परका, गटाचा – तटाचा विचार न करता इमानेइतबारे रुग्णसेवा केली. यापुढेही गट-तट, राजकीय अभिनिवेश असले मतभेद न मानता, जोपर्यंत कोरोना असेल तोपर्यंत रुग्णांसाठी अहोरात्र कार्यरत राहीन.