मुंबई : हिंदू धर्मात होळीला अत्यंत महत्वाचे स्थान आहे नकारात्मक शक्ती, वाईट प्रवृत्तींचे दहन करून सकारात्मक ऊर्जा मिळण्यासाठी होळीचे दहन केले जाते. विधीवत पूजा करूनच होळी प्रज्वलित केली जाते. मात्र होळीचे दहन करताना भाजपा खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा या दांपत्याने प्वित्र होळीला चपलांचा हार घालून ती पेटवल्याबद्दल सर्वस्तरावून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोपदेखील करण्यात येत आहे.
गेल्या 11 वर्षांपासून मेळघाटातील आदिवासींसोबत राणा दांपत्य होळीचा सण साजरा करतात. आदिवासींमध्ये होळीला एक विशेष महत्व आहे. यंदा राणा दांपत्याने होळी पेटवण्यापूर्वी आदिवासींच्या पारंपारिक नृत्यावर ठेकाही धरला.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनअधिकारी दिपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार याच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. त्या शिवकुमारचा बॅनर यावेळी आदिवासींनी आपल्या होळीवर लावला होता आणि त्याला चपलांचा हार घातला होता. ती होळी राणा दांपत्याने पेटवली. त्यांच्या या कृतीवर सर्व स्तरातून टीका करण्यात येत आहे.
शिवकुमार याच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी जनभावना आहे. परंतु पवित्र होळीला चपलांचा हार घालून हिंदुधर्मियांच्या भावना दुखावल्याबद्दल राणा दांपत्याचा निषेध व्यक्त होत आहे. केवळ प्रसिध्दीसाठी राणा दांपत्याने हे कृत्य केल्याचा आरोप होत असून त्यांच्यावर कारवाईचीही मागणी जोर धरू लागली आहे.