जनावरांचे हाल; ऊस उत्पादनातही घट
कराड – कराड तालुक्यातील बहुतांश परिसरात उसाला तुरे आल्याने उत्पादनात घट होत आहेच, शिवाय जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. चारा टंचाईमुळे त्रस्त झालेल्या काही शेतकऱ्यांनी गुरे विकली आहेत. चारा टंचाईची धग येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे.
कराड तालुका हा मुख्यतः ऊस पट्टा म्हणून ओळखला जातो. यंदा कराड तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. महापुरामुळे ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यातूनही सुपने, कार्वे, कोपर्डे, मसूर, केसे, विंग, वडगाव, काले व अन्य काही भागात ऊस जोमदार आला आहे. मात्र, पिकाला तुरे आल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गतवर्षी कडब्याचा दर तीन हजार रुपये शेकडा होता. चाऱ्याचे दर वाढत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कमी प्रमाणात कडबा विकत घेतला.
आणखी चाऱ्यासाठी शेताच्या बांधावरील हिरवे गवत वापरले. आता ते गवतही संपल्याने जनावरांसाठी फक्त उसाच्या वाढ्याचा आधार आहे. गेले काही वर्षांपासून कराड तालुक्यातील बऱ्याच ऊस पिकाला तुरे येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सगळ्या शिवारात उसाचे वाढे चाऱ्यासाठी योग्य नाही. परिणामी चारा टंचाई वाठ आहे. जेथे उसाला तुरे आलेले नाहीत, तेथे वाढ्याच्या किमती वाढल्या आहेत. हे दर परवडणारे नसल्याने सर्वसामान्य शेतकरी या चाऱ्याकडे पाठ फिरवत आहेत. उन्हाळा सुरू होण्यास अजून अवधी आहे. उन्हाळ्यात चाऱ्याविना जनावरांचे हाल होतात. त्यामुळे आताच जनावरांच्या चाऱ्याची सोय करणे गरजेचे आहे.