मोशी -अतिवृष्टीचा मार झेलेल्या बळीराजांच्या डोक्यावर आता संकटाचे ढग घोंघावू लागले आहेत. एकीकडे कांद्याला चांगला भाव आल्याने आनंदी झालेल्या शेतकऱ्यांना हाती येत असलेल्या कांद्याच्या पिकाचे नुकसान होण्याची भीती वाटत आहे.
शहरातील पुनावळे, मोशी, चिखली तसेच इतरही काही भांगामध्ये अजूनही शेती केली जाते. विशेषतः मोशीपासून पुढे शहराबाहेर खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेती आहे. महिन्याभरापूर्वी शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या कांदा पिकावर ढगाळ वातावरणामुळे रोगराईचा प्रादुर्भाव होण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रत झाले असून औषध फवारणी सुरू केली आहे.
काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. मंगळवारी दिवसभर ढग दाटून आले होते. ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील कांदा व ज्वारीच्या पिकावर किडी रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी कांदा व इतर पिकावर औषध आणून फवारणी सुरू केली आहे. ही औषधे महाग असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे. यंदा कांद्याला चांगला भाव मिळत आहे आणि अशातच वातावरण बिघडल्यामुळे हाता-तोंडाशी घास हिरावण्याची भीती निर्माण झाली आहे.
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या मुसळधार पावसाने ओढे, नाले, पाझर तलाव, विहिरी तसेच छोटे-मोठे बंधारे तुडुंब भरुन वाहत असून यंदा पाणी साठा मुबलक आहे. यामुळे शेतकरी वर्गांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली आहे. मध्यंतरी थंडी पडू लागली होती त्यामुळे हवामान पोषक ठरणार असे वाटू लागले होते. अचानक आलेल्या ढगांनी बळीराजाची काळजी वाढविली आहे.