पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. धरणातील पाणीसाठा 17 टक्यांवर आला आहे. मात्र, पावसाळा सुरू होऊनही धरण क्षेत्राला अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत धरण परिसरात दमदार पाऊस न पडल्यास शहरात पाणी कपात करण्याचा निर्णय घेतल्याने शहरावासीयांना ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.
शहराला गेल्या अडीच वर्षांपासून दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. उन्हाळ्यातही नागरिकांचे पाण्याविना मोठे हाल झाले होते. जून महिना संपला तरी दमदार पाऊस पडत नसल्याने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पवना धरणातील पाणीसाठा 17 टक्यांवर आल्यामुळे महापालिकेने पाण्याचा काटकसरीने आणि आवश्यक ती पाऊले उचलून पाणी कपात करावी, अशी सूचना पाटबंधारे विभागाने महापालिकेला केली होती. त्यानुसार गुरूवार (दि.30) जून रोजी महापालिकेत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसह पाणी पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली.
याबाबत माहिती देताना पिंपरी-चिंचवड महापालिका पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे म्हणाले, जून महिन्यात धरण परिसरात फक्त 70 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे पाणी कपातीचे संकट ओढवले आहे. आयुक्त राजेश पाटील यांनी पाण्याचे नियोजन करण्याचे सांगितले आहे. येत्या आठ दिवसांत धरण परिसरात दमदार पाऊस न पडल्यास पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागणार आहे. सध्या लहान परिसरात 1 तास, 2 तास तर मोठ्या परिसरात 3 तास, 4 तास पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी कपात करण्याची वेळ आल्यास पाणी सोडण्याचा सध्याचा जो कालावधी आहे त्यामध्ये निम्म्याने कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
2013 मध्ये सर्वाधिक पाऊस
पवना धरण परिसरात 2007 पासून 30 जूनअखेर कधी कमी तर कधी मुबलक पाऊस पडला आहे. यामध्ये 2014 फक्त 80 मिलीमीटर तर त्यानंतर यंदा फक्त 70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच 2013 मध्ये तब्बल 1050 मिलीमीटर, 2011 मध्ये 773 तर 2021 मध्ये 538 मिलीमीटर पाऊस झाला होता. गेल्या 16 वर्षांत 2015 मध्येच फक्त धरण 88 टक्के भरले होते. अन्यथा दरवर्षी धरण 100 टक्के भरले जाते.