-राहूल गोखले
ज्या तेवीस नेत्यांनी आता सोनिया गांधी यांना पत्र लिहिले त्यांना ते आताच का लिहावेसे वाटले, हा एक प्रश्नच आहे. कॉंग्रेस गेली पाच-सहा वर्षे सातत्याने देशभर संकोचत आहे आणि सलग दोन्ही लोकसभा निवडणुकीत पक्षाने उण्यापुऱ्या पन्नास जागा मिळविल्या होत्या. खरे तर आत्मपरीक्षण तेव्हाच सुरू होणे गरजेचे होते.
कॉंग्रेसमध्ये सर्व काही अलबेल नाही याची प्रचिती पुन्हा एकवार आली आहे. पक्षातील तेवीस ज्येष्ठ नेत्यांनी कॉंग्रेस अध्यक्षांना पत्र लिहून पक्षात आमूलाग्र बदल करण्याची आणि मुख्य म्हणजे पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष असण्याची मागणी केली आणि एकच खळबळ माजली. ही खळबळ माजण्याचे एक कारण प्रत्यक्षात ते पत्र आणि त्यातील मजकूर हे होतेच; पण त्याबरोबरच दुसरे आणि तितकेच महत्त्वाचे कारण म्हणजे ज्यांनी हे पत्र लिहिले ते सगळे कॉंग्रेसशी एकनिष्ठ मानले जाणारे नेते होते हेही होते. या पत्राने काही गोष्टी अवश्य साध्य केल्या. एक म्हणजे कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना कार्यकारिणीची तातडीची बैठक बोलवावी लागली आणि पुढील काही महिन्यांत कॉंग्रेसचे अधिवेशन बोलावून नव्या आणि पूर्णवेळ अध्यक्षांची निवड केली जाईल, असे आश्वासन द्यावे लागले.
दुसरीकडे जे पत्र खरे तर गोपनीय असणे आवश्यक होते त्याची वाच्यता झाल्याने ज्या नेत्यांनी हे पत्र लिहिले होते त्यांच्या शिडातील हवा काढून घेण्यात सोनिया यशस्वी झाल्या आणि दुसरीकडे देशभर या नेत्यांना कॉंग्रेस पक्षात फारसा पाठिंबा नाही हे त्या सिद्ध करू शकल्या. उलटपक्षी त्या पत्रलेखक नेत्यांना काहीसा बचावात्मक पवित्रा घेण्यास त्यांनी बाध्य केले. तेव्हा राजकीय आकलनाच्या दृष्टीने आपण सरशी केली आहे याचा पुरावा सोनिया यांनी दिला.
येऊ घातलेले वादळ सोनिया यांनी तूर्तास शमविले आहे. मात्र, वादळ पुन्हा येणार नाही इतकी तजवीज त्या करू शकलेल्या नाहीत. एरवी पुढच्या काही महिन्यांतच पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळेल असे आश्वासन त्यांनी दिले नसते. तेव्हा कॉंग्रेस पक्षात एका अर्थाने अस्वस्थता आहे ती उघड झाली आणि सोनिया यांनी सध्या जरी आपले स्थान बळकट केले असले, तरी पक्षांतर्गत एवढी अस्वस्थता असताना एकदिलाने जनतेला पक्ष कसा सामोरा जाणार हा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाला आहे. मध्य प्रदेशात, गोव्यात, कर्नाटकात सत्ता जात असताना कॉंग्रेसमध्ये त्वरा दिसायला पाहिजे होती.
राजस्थानात सरकारचे अस्तित्व पणाला लागले असताना नेत्यांनी ठोस पावले उचलणे आवश्यक होते. अनेक राज्यांत कॉंग्रेसचे स्थान तकलादू होत असताना नेत्यांनी सजगता आणि तातडी दाखविणे गरजेचे होते. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर सोडल्यानंतर सोनिया यांनाच हंगामी अध्यक्ष करण्याचा निर्णय झाला तेव्हाच पूर्णवेळ अध्यक्षाची मागणी होणे जरुरी होते. मात्र यातील कोणत्याही प्रसंगी कॉंग्रेस नेत्यांनी धाडस दाखविले नाही. कॉंग्रेसला पुनरुज्जीवित करण्यासाठी तात्पुरते आणि मामुली उपाय करण्याची वेळ आता नाही. तेथे धैर्य आणि वेग या दोन्हीची आवश्यकता आहे.
महाराष्ट्रात सत्तेत राहायचे आणि आपला निर्णय प्रक्रियेत काहीच सहभाग नाही, असे रडगाणे गायचे हाही सवंगपणा झाला. वस्तुतः या सरकारला तिन्ही पक्षांची तितकीच गरज आहे. मात्र, कॉंग्रेसने कधी विधान परिषदेच्या निवडणुकीत आपला अतिरिक्त उमेदवार मागे घेऊन कचखाऊपणा केला तर कधी आपण केवळ सरकारमध्ये संख्येपुरते आहोत, असे अप्रत्यक्ष सांगून आपली हतबलता दर्शविली. तेव्हा केवळ सत्तेसाठी आपण या सरकारमध्ये आहोत असे चित्र निर्माण कॉंग्रेसनेच केले. अशी अगतिकता तेव्हाच येते जेव्हा लढण्याची उर्मी राहात नाही आणि कुठे सत्ता मिळण्याची शक्यता कमी असते. कॉंग्रेसला ग्रासले आहे ते या मरगळीने आणि दिशा देणाऱ्या नेतृत्वाच्या अभावाने. मात्र त्या गंभीर व्याधीकडे दुर्लक्ष करून पक्षांतर्गतच दुफळी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या नेत्यांनी हे पत्र लिहिण्यास तसा विलंबच केला आहे हे तर खरेच; पण म्हणून त्यातील गांभीर्य कमी होत नाही. उलट ज्यांनी पत्र लिहून पक्षाच्या एकूण दयनीय स्थितीविषयी खंत व्यक्त केली त्यांनाच एका प्रकारे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले गेले आहे.
मात्र, त्याने पक्षात चैतन्य निर्माण होणार नाही आणि पक्षाची वाटचालदेखील गतिमान होणार नाही. राहुल गांधी यांनी अध्यक्ष होण्यास वारंवार नकार दिलेला असताना सोनिया यांनी हंगामी अध्यक्षपद सोडल्यानंतर राहुल यांनीच पक्षाध्यक्षपद स्वीकारावे अशी जी मागणी लगेच पक्षातून व्हायला लागली आणि मुख्य म्हणजे पत्रलेखक नेत्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी कुरघोडी करण्यासाठी ती केली त्यानेच कॉंग्रेसमध्ये काय होणार याची चुणूक मिळाली आहे. गांधी-नेहरू कुटुंबाबाहेरील व्यक्तीने जेव्हा जेव्हा कॉंग्रेसचे नेतृत्व केले तेव्हा ते पक्ष सांभाळू शकले नाहीत, असाही एक युक्तिवाद या स्वरांमध्ये होता. मात्र, राजकारण कलाटणी घेत असते आणि जे सिद्धांत वीस-पंचवीस वर्षांपूर्वीपर्यंत लागू होत होते तेच आता लागू होतील, असे मानणे म्हणजे वास्तवाशी प्रतारणा होय किंवा वास्तव स्वीकारण्यास दिलेला नकार होय. जुन्याच कल्पनांना कवेत घेऊन राहिले की काय होते याचे जसे डावे पक्ष हे एक ज्वलंत उदाहरण आहे तद्वत कॉंग्रेस हेदेखील एक उदाहरण आहे.
इंदिरा गांधी किंवा सोनिया गांधी यांनी पूर्वी पक्षाला चांगले दिवस आणले म्हणून आताही तेच सूत्र उपयोगी पडेल असे नाही. सलग दोन लोकसभा निवडणुकीत पक्षाची किती दारुण स्थिती झाली आहे याचे स्मरण सर्वांनाच आहे. प्रश्न कॉंग्रेसमधील मुखंडांना त्याची बोच आहे का, हा आहे. कॉंग्रेसकडे भाजपेतर पक्षांचे नेतृत्व करावे, असेही बळ राहिलेले नाही. कारण देशभरात अनेक प्रादेशिक पक्षांनी कॉंग्रेसपेक्षा फार कमी जागा जिंकलेल्या नाहीत. तेव्हा खरे तर मूलगामी बदल आणि रूढ कल्पनांचा त्याग यावाचून कॉंग्रेससमोर तरणोपाय नाही. केंद्रातील भाजप सरकारला कोंडीत पकडावे अशा अनंत घडामोडी घडत आहेत. मात्र, पराभूत मनोवृत्तीतून कॉंग्रेस बाहेर पडू इच्छित नाही.
केवळ समाजमाध्यमांवरून सरकारवर टीका करून जनतेत स्थान निर्माण होणार नाही. भाजप नेते समाजमाध्यमांवर सक्रिय असतात. मात्र, त्यांच्यामागे एक प्रबळ संघटना उभी आहे. कॉंग्रेसकडे प्रबळ तर सोडाच साधी सक्रिय संघटनादेखील नाही. पक्षाच्या आत कोणी कितीही कुरघोड्या केल्या तरी बाहेर त्या कुरघोड्यांना जनता किती किंमत देते हे महत्त्वाचे. पक्षात बुजुर्ग विरुद्ध तरुण असा संघर्ष आहे असादेखील एक प्रवाद आहे. पण कॉंग्रेसमध्ये खरा संघर्ष असावयास हवा तो अगतिकता विरुद्ध सळसळते चैतन्य असा; दरबारी राजकारण विरुद्ध जनतेचे मुद्दे असा. तसे झाले तरच कॉंग्रेसला आपले अस्तित्व टिकवून ठेवता येईल. आजही गावागावांत पोहोचलेला एकमेव पक्ष अशी कॉंग्रेसची ओळख आहे. गरज आहे, ती सक्षम आणि निश्चयी नेतृत्वाची. असे नेतृत्व कॉंग्रेसने दिले तर, विरोधकांची जी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून निघेल. त्यानेच लोकशाही बळकट होईल.
तेवीस नेत्यांनी लिहिलेल्या पत्राने वस्तुतः कॉंग्रेससमोरील संकटाची नांदी म्हटली आहे. पण त्या नांदीकडे दुर्लक्ष केले तर कॉंग्रेसच्या अस्तित्वाचा तिसरा अंक सुरू होण्यास वेळ लागणार नाही.