कॉंग्रेसेतर विरोधी पक्षांचे राष्ट्रपतींना पत्र
नवी दिल्ली -हिंसाचारग्रस्त ईशान्य दिल्लीत शांतता प्रस्थापित होण्याची निश्चिती करण्याचे आदेश द्यावेत. तसेच, हिंसाचार घडवणाऱ्यांवर आणि द्वेषयुक्त वक्तव्ये करणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल व्हावेत, अशी मागणी कॉंग्रेसेतर विरोधी पक्षांनी केली आहे. तसे पत्र त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठवले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस, माकप, भाकप, राजद, द्रमुक आणि आप या पक्षांनी संबंधित पत्र राष्ट्रपतींना पाठवले आहे. हिंसाचारामुळे बेघर झालेल्यांसाठी मदत छावण्या उभारल्या जाव्यात. हिंसाचारग्रस्तांना पुरेशी सुरक्षा पुरवली जावी, अशी मागणीही पत्रातून करण्यात आली आहे. त्याशिवाय, देशाच्या राजधानीतील स्थितीवर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे.
दिल्ली हिंसाचारावरून कॉंग्रेस शिष्टमंडळाने गुरूवारी राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. हिंसाचार रोखण्यात केंद्र सरकारला अपयश आले. त्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्या निवेदनातून करण्यात आली. कॉंग्रेसपाठोपाठ इतर विरोधी पक्षही हिंसाचारावरून आक्रमक झाले आहेत.