मकरंद पाटील; वाई मतदारसंघातील करोना उपाय नियोजनाबाबत आढावा बैठक
वाई – करोनाला रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. उगीचच रस्त्यावर फिरताना व आदेशाला कोळून पिणाऱ्या लोकांवर पोलीस प्रशासन गुन्हे दाखल करण्याची भूमिका घेणार आहे, याची गैरवर्तन करणाऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आमदार मकरंद पाटील यांनी सूचित केले. करोना विषाणूच्या अनुषंगाने वाई मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वाई प्रांत कार्यालयात आढावा बैठक पार पडली.
वाई शहरासह तालुक्यातील गावागावांमधील किरकोळ अपवाद वगळता नागरिक घरातच बसून आहेत. त्यामुळे दैनंदिन जीवनावश्यक वस्तूचा पुरवठ्याचे वितरण व नियोजन कशा पद्धतीने सुरू आहे, याची माहिती घेण्यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी अचानक भेट देऊन बैठक घेतली. मकरंद पाटील म्हणाले, “”मतदारसंघातील वाई, महाबळेश्वर व खंडाळा या तिन्ही तालुक्यांतील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे या ठिकाणचे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, अंगणवाडी सेविका, आशा असे सर्व जण करोनो संबंधित व मुंबई, पुणे व परदेशातून नागरिक गावी आल्याने त्यांची संख्या जवळपास दहा हजारांपर्यंत आहे, अशांची तपासणी करण्यासाठी मास्क, सॅनिटायझरचा तातडीने पुरवठा करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे.
तिन्ही तालुक्यांतील जनतेने प्रशासनाला सहकार्य करून स्वतःचीही काळजी घेतली पाहिजे. अजून 15 दिवस लोकांनी घरातून बाहेर न पडता सहकार्याची भूमिका घेतल्यास आपण या विषाणूवर शंभर टक्के विजय मिळवू शकतो.” तिन्ही तालुक्यांमधील गावांमध्ये मुंबई, पुणे व परदेशातून आलेल्या नागरिकांनी रस्त्यावर किंवा विहिरी, धरण, नदी, कालवे, तलाव अशा ठिकाणी मौजमजा करण्यासाठी अथवा पोहण्याकरता जाऊन या आजाराची तीव्रता वाढण्यास मदत होईल, असे वर्तन कोणीही करू नये, असे आवाहन त्यांनी केले. असे वर्तन करताना आढळल्यास, उगीचच रस्त्यावर फिरताना व आदेशाला कोळून पिणाऱ्या लोकांवर पोलीस प्रशासन गुन्हे दाखल करण्याची भूमिका घेणार आहे याची गैरवर्तन करणाऱ्यांनी नोंद घ्यावी, असेही आमदार पाटील यांनी सूचित केले.
गावोगावी व वाई शहरात किराणा माल, भाजीपाल्याची घरपोच सेवा उपलब्ध करुन देण्याची सोय केली आहे, असे असतानाही बरेच नागरिक आपापल्या दुचाकी घेऊन विनाकारण फिरतात ही बाब दुर्दैवी आहे, असे त्यांनी सांगितले. तीन तालुक्यांतील गावागावांमधील स्वस्त धान्य दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना एप्रिल आणि मे महिन्याचे धान्यवाटप सुरू झाले आहे, त्यामुळे जनतेसमोर उपासमारीसारखी संकट कोसळणार नाही याचीही प्रशासनाने काळजी घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.
खासगी दवाखाने तातडीने सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना त्यांनी प्रांताधिकारी, तिन्ही तालुक्याचे तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तिन्ही तालुक्यांतील जनतेने प्रशासनातील अधिकाऱ्यांना व पोलीस प्रशासनाला सहकार्याची भावना ठेवावी तरच आपण करोना विषाणूला हद्दपार करू शकतो, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले.
आ. मकरंद पाटील यांचे आवाहन
वाई, महाबळेश्वर, खंडाळा या तिन्ही तालुक्यांतील तरुण मंडळे, सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींनी व राजकीय कार्यकर्त्यांनी आपले गटतट विसरून देशावर व राज्यावर पर्यायाने आपल्या गावावर कोसळलेले करोनासारख्या संकटाचा सामना करण्यासाठी सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये रेशनिग कार्ड नाहीत, अशा गरजूंना व शेतमजुरांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळणार नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी आपआपल्या गावातील कार्यकर्त्यांनी धान्य गोळा करून त्यांच्यापर्यंत पोचविण्याचे कार्य करावे, असे आवाहन आमदार मकरंद पाटील यांनी केले आहे.