नवी दिल्ली: जेएनयुमधील वसतीगृहांच्या विविध दरांमध्ये सरकारने प्रचंड वाढ केली आहे. त्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काल संसद भवनावर मोर्चा आयोजित केला होता. या प्रकरणात आता पोलिसांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल केले आहेत. संबंधीत कलमांनुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत एवढीच माहिती पोलिसांनी दिली आहे. पण त्याचा अन्य तपशील मात्र त्यांनी जाहींर केलेला नाही.
काल सरकारने अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना करूनही संसदेच्या परिसरात हजारो विद्यार्थी एकत्र आले होते. त्यामुळे या भागातील वाहतूकही मोठ्याप्रमाणात विस्कळीत झाली होती.
यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांना रोखल्यानंतर पोलिस व निदर्शकांमध्ये झटापटही झाली. त्यानंतर पोलिसांनी या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार केला. त्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. संसद भवनाच्या जवळच्या रस्त्यावर या विद्यार्थ्यांनी काल तब्बल आठ तास निदर्शने केली. यावेळी झालेल्या चकमकीत 30 पोलिस कर्मचारी आणि 15 विद्यार्थी जखमी झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. काल या विद्यार्थ्यांना संसदेवर मोर्चा काढण्यास रोखण्यासाठी जेएनयुच्या गेटसमोर निमलष्करी दले आणि मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी उभारलेले बॅरिकेट्स मोडून विद्यार्थ्यांनी बाबा गंगनाथ मार्गापर्यंत धडक मारली होती. त्यानंतर त्यांना सफदरजंग टॉम जवळ अडवण्यात आले. या प्रकारानंतर पोलिसांनी शंभर विद्यार्थी निदर्शकांना अटक केली आहे. त्यात विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचाहीं समावेश आहे.