नगर (प्रतिनिधी) – दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी करोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढल्याप्रकरणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह नगरमधील 150 आंदोलकांवर काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस कॉन्स्टेबल तन्वीर शेख यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नगर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते असलेल्या रवींद्र मोरे, प्रकाश देठे, मंगेश आजबे, सुनील लोंढे, भीमराव धांडे, ऋषिकेश ढुणे, स्नेहल फुंदे, पूजा मोरे यांच्यासह दीडशे आंदोलकाचा यात समावेश आहे.
शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. अतिरिक्त पोलिस अधीक्षक सागर पाटील व पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखालील पोलीस दलाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अलिकडील चौकात जनरल पोस्ट ऑफीससमोरच मोर्चा अडविला. तेथील चौकातच शेट्टी यांनी राज्य व केंद्र सरकारवर सडकून टीका केली.
दरम्यान, आंदोलनात सहभागी झालेल्यांनी करोना प्रतिबंधक नियमांचा पुरता फज्जा उडविला असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. मोर्चात सहभागी झालेल्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या तोंडाला मास्क नव्हते. तसेच त्यांच्यात फिजिकल डिस्टंसिंगही नव्हते. मोर्चात सहभागी झालेले कार्यकर्ते एकमेकांना अगदीच खेटून चालत होते.
नगरमध्ये काल रात्रीपर्यंतच करोनाबाधिताच्या संख्येने जवळपास पंधरा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. करोना विषाणूची नगरमध्ये प्रचंड दहशत असताना “स्वाभीमानी’ने केलल्या केलेल्या या आंदोलनाकडे नगरकर काल भयचकित होऊनच पाहत होते. त्यातील एखादा सहभागी करोनाबाधित असल्यास काय होईल? या भीतीनेच नगरकरांची गाळण उडाली होती.