पिंपरी – अग्निशमन प्रतिबंधक योजना न राबविणाऱ्या कुंदननगर, कासारवाडी येथील तीन मिळकतधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका बड्या रुग्णालयाचा देखील समावेश आहे. पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाचे अधिकारी उदय वानखेडे (वय46, रा. कामगारनगर, पिंपरी) यांनी भोसरी ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कुदंननगर, कासारवाडी येथे 31 जानेवारीला पहाटे दोन वाजता लाग लागली होती. शाम लांडे यांनी अग्निशामक दलाला याबाबतची वर्दी दिली होती. मॅक्स न्यूरो रुग्णालयाजवळील जय गणेश टायर्स गोडाऊनला लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट झाले होते. या धुरामुळे शेजारील मॅक्स न्यूरो रुग्णालयांतील रुग्णांच्या जीवास धोका निर्माण झाला होता. खबरदारीचा उपाय म्हणून 19 रुग्णांना पिंपरीतील डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालय, वायसीएम रुग्णालय व थेरगावमधील आदित्य बिर्ला रुग्णालयात हलविण्यात आले.
टायरच्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात अनाधिकृत रबर व टायरचा साठा होता. रबर टायरास आग लागल्याने, परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट झाले होते. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेत, आग विझविण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका अग्निशामक विभाग तसेच पुणे महापालिका, पीएमआरडीए, खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड व टाटा मोटर्स यांच्याकडील अग्निशामक विभागाकडील एकूण 14 अग्निशमन वाहनांची मदत घेण्यात आली. पाच तासांत आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक दलाला यश आले. यामध्ये सुमारे पाच लाख लिटर्स पाण्याचा वापर करण्यात आला.
दरम्यान, जय गणेश टायर्स गोडाऊनची आग विझविताना याठिकाणी कोणत्याही प्रकारची अग्निशामक उपकरणे अथवा साधने नसल्याचे आढळले. तर या मिळकतीचे मालकांकडे विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा अग्निशामक दलाचा ना- हरकत दाखल नव्हता. तर मॅक्स न्यूरो रुग्णालयात अपुरी अग्निशामक यंत्रणा लावल्याचे दिसून आले. त्यांना याबाबत यापूर्वी फायर ऑडिटमध्ये कळविण्यात आले होते, असे या तक्रारीत नमूद केले आहे.
खबरदारी घेण्याचे आवाहन
महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम, 2006 हा कायदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू असून, अधिनियमातील कलम 3(1) प्रमाणे कोणत्याही निवासी, वाणिज्य, मिश्र, व्यावसासिक मिळकती किंवा तिच्या भागामध्ये आवश्यक असणाऱ्या आग प्रतिबंधक उपयायोजना करणे, त्या कार्यान्वित ठेवणे, याची संपूर्ण जबाबदारी ही त्या इमारतीचा मालक किंवा तिचा वापर करणारा भोगवटादार यांची आहे. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व व्यावसायिकांना अग्निशामक दलाच्या वतीने खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आल आहे.