लखनौ – सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या इटावामध्ये घडली आहे. आत्महत्येपूर्वी तरूणाने एक फेसबूक पोस्ट लिहिली आहे त्यामध्ये ‘माझ्या मृत्यूला माझी पत्नी जबाबदार आहे’ असे म्हंटले आहे. तरुणाला सासरची मंडळी आणि पत्नीने मारहाण केली होती. त्यामुळेच त्याने टोकाचा निर्णय घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव भूपेंद्र असून तो अहमदाबादमध्ये नोकरी करत होता. त्याचे वडील राम बहादूर दिवाकर यांनी सांगितले की, भूपेंद्रचे लग्न 2016 मध्ये रुकवा गावच्या मूर्ती देवी सोबत झाले होते. त्यानंतर ते दोघे अहमदाबादमध्ये राहत होते. रविवारी संध्याकाळी अचानक मुलगा घरी आला आणि सासरच्या मंडळींनी त्याला बेदम मारहाण केल्याचे सांगितले. यानंतर त्याने खोलीत जाऊन गळफास लावून आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तरुणाच्या आईवडिलांनी सुनेच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. तरुणाने मृत्यू आधी फेसबुकवर सुसाईड नोट लिहिली होती. ज्यामध्ये त्याने आपल्या मृत्यूसाठी आपल्या पत्नीला जबाबदार धरले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.