पुणे – गांजा तस्करी प्रकरणात मुख्य आरोपीला विशेष न्यायाधीश जे.जी.डोरले यांनी जामीन मंजुर केला आहे. आकाशचंद्र पार्थव नायक (रा. ओरीसा) असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. राजू लक्ष्मणराव मते आणि ऍड. श्रीनाथ राजू मते यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. नायक याला 24 किलो 178 ग्रॅम गांजा बाळगल्या प्रकरणी 13 डिसेंबर 2022 रोजी कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली होती.
त्याच्यावर एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात नायक याच्या वतीने ऍड. राजू लक्ष्मणराव मते आणि ऍड. श्रीनाथ राजू मते यांनी जामिनासाठी अर्ज केला. जप्त केलेला गांजा नेमका किती होता. गांजात पाने किती, बिया, बोंडे किती, देठ किती हे गांजाच्या रासायनिक विश्लेषण तपासणी अहवालावरून ( सीए रिर्पाट ) स्पष्ट होत नाही.
त्यामुळे तो विक्री साठी आणलेला गांजा होता, असे म्हणता येणार नाही, त्यामुळे त्याला जामीन देण्यात यावा, असा युक्तीवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला. बचाव पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने जामीन मंजुर केला.