१०० नंबर वर ७८ हजार तक्रारी; २ कोटी ७४ लाख दंडाची आकारणी
मुंबई : राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात दि.२२ मार्च ते २५ एप्रिल या कालावधीत कलम १८८ नुसार ७२,६९८ गुन्हे दाखल झाले असून १५,४३४ व्यक्तींना अटक करण्यात आली. तर या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी २ कोटी ७४ लाख ४३ हजार ३९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला, अशी माहिती गृह विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.
उपरोक्त कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या १०० नंबरवर ७८,४७४ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का असून ज्यांनी नियमांचा भंग केला अशा ६१० व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले.
या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १०९२ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ४७,७८२ वाहने जप्त करण्यात आली. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनाचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.