भोपाळ: भाजप पेक्षा मध्यप्रदेश आता कॉंग्रेसच्या हातात सुरक्षित असल्याचा दावा तेथील सरकारने केला असून या सरकारने जानेवारी ते एप्रिल या चार महिन्याचा राज्यातील गुन्हेगारीचा तपशील आज जाहींर केला. त्यानुसार या चार महिन्यात राज्यातील गुन्ह्यांचे प्रमाण 5.35 टक्क्यांनी घटले आहे. राज्याचे गृहमंत्री बाला बच्चन यांच्या उपस्थित झालेल्या गृहविभागाच्या बैठकीत पोलिस अधिकाऱ्यांनी ही माहिती सादर केली.
राज्याचा कायदा आणि सुव्यवस्था स्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी राज्यातील गुन्हेगारी स्थितीची आकडेवारी सादर केली त्यानुसार सन 2019 सालातील जानेवारी ते एप्रिल या महिन्यात गुन्हेगारीचे प्रमाण 5.35 टक्क्यांनी घटले आहे. भाजपच्या शिवराजसिंह चौहान यांच्या कारकिर्दीत गेल्या वर्षी याच कालावधीत जेवढे गुन्हे नोंदवले गेले होते. त्यापेक्षा या चार महिन्यातील गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीयरित्या घटल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या बैठकीला गृह विभागाचे सचिव एस. एन मिश्रा, राज्याचे पोलिस महासंचालक व्ही के सिंह आणि अन्य वरीष्ठ अधिकारीही उपस्थित होते. यात खुनाच्या प्रयत्नांच्या गुन्ह्याचे प्रमाण 9.65 टक्क्यांनी घटले आहे तर दरोड्यांचे प्रमाण तब्बल 78 टक्क्यांनी घटले आहे. लुटीच्या गुन्ह्यांचे प्रमाण 16.16 टक्क्यांनी घटले आहे.
भारतीय जनता पक्षाने हा दावा खोडून काढताना म्हटले आहे की राज्यात आचार संहिता या काळात लागू होती. व या काळात राज्यात सीआरपीएफचे दल तैनात होते म्हणूनच ही गुन्हेगारी घटली असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाने केला आहे.