नोएडा – कॉंग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि अन्य कॉंग्रेस कार्यकर्त्यांना हाथरस येथे जाण्यापासून काल रोखण्यात आले. तसेच त्यांना त्यावेळी बेकायदा जमाव जमवल्याच्या कारणावरून ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आल्याचा प्रकार घडला होता.
या प्रकरणात पोलिसांनी आज राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि दोनशे कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर करोना प्रतिबंधक उपायांचा भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळले नाही, मास्क परिधान केला नाही, अशा कारणावरून त्यांच्यावर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आयपीसीच्या 188, 270, 269 अन्वये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गौतमबुद्ध नगर पोलिसांत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कॉंग्रेसच्या काही कार्यकर्त्यांवर पोलिसांवर हल्ला केल्याचे गुन्हेही नोंदवण्यात आले आहेत.
काल गुरुवारी हाथरसकडे निघालेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांना व नेत्यांना दिल्ली-आग्रा रस्त्यावरच अडवण्यात आले होते. तेथे मोठाच गोंधळ उडाला होता, त्यातच पोलिसांनी राहुल गांधी यांना धक्काबुक्की करून त्यांना जमिनीवर पाडण्याचाही प्रकार घडला होता.