नगर – महावितरण कार्यालयासमोर दशक्रिया विधी केल्याप्रकरणी माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांविरुध्द कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रहारच्या नेतृत्वाखाली सोमवारी महावितरणाच्या मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर दहा वाजता दशक्रिया विधी करण्यात आला. सारोळा सोमवंशी ता. श्रीगोंदा) येथील आढाव कुटूंब शेतात गवत आणण्यासाठी गेले होते.
घरी येत असताना शेतात पडलेल्या विद्युत तारेचा शॉक संदेश अनिल आढाव यांना बसला. संदेशला वाचविण्यासाठी त्याची बहीण प्रतिक्षा मदतीला धावली. हे दोघे तारेच्या विद्युत प्रवाहाशी चिकटलेले असतांना त्यांना वाचविण्यासाठी संदेश व प्रतीक्षेची आई रोहिणी धावल्या असता त्यांनाही शॉक लागला. रोहीणी यांनी प्रसंगावधान दाखवून हाताला कपडा गुंडाळून प्रतिक्षाला सुरूवातीला तारेला चिकटलेल्या संदेशपासून वेगळे केले. त्यानंतर प्रतीक्षा बेशुध्द पडली. तर संदेश याचा जागीच मृत्यू झाला.
वीज खांबावरील विद्युत तार शेतात पडल्याचे निदर्शनास आणून देउूनही महावितरण कडून दखल घेण्यात आलेली नाही. घटनेच्या दुसऱ्या दिवशी विद्युत तारा शेतात पडून होत्या. त्यातून विज प्रवाह चालू होता. त्यामुळे ही घटना घडल्याचा संशय व्यक्त करून आढाव कुटूंबाच्या वतीने हा दशक्रिया विधीचा कार्यक्रम करण्यात आला.
पोलिसांनी प्रहार जनशक्तीच्या जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी हभप अजय महाराज बारस्कर संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष पवार, अजित धस, प्रकाश बेरड, श्रीकृष्ण खामकर, अभिषेक कळमकर तसेच इतर 25 ते 30 जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.