क्रिकेटपटू संघटनेचा बीसीसीआयला सवाल
नवी दिल्ली – माजी आंतरराष्ट्रीय तसेच प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये खेळलेल्या खेळाडूंना निवृत्तिवेतन तसेच अन्य सर्व सुविधा कधी मिळणार, असा सवाल भारतीय क्रिकेटपटू संघटनेचे अध्यक्ष व माजी कसोटीपटू अशोक मल्होत्रा यांनी बीसीसीआयला केला आहे.
आज बीसीसीआयची सूत्रे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सौरव गांगुली याच्याकडेच आहेत तरीही आमच्या मागण्यांवर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. गेले 10 महिने अनेक क्रिकेटपटू अत्यंत हलाखीत दिवस काढत आहेत. त्यांना वेळेवर मदत मिळाली तर उपयोग होणार आहे. सत्तरी पार केलेले खेळाडू आता आणखी वाट पाहू शकत नाहीत. बीसीसीआयने तयार केलेल्या नियमामुळे 25 पेक्षा जास्त प्रथम दर्जाचे सामने खेळलेल्या खेळाडूंनाच निवृत्तिवेतन दिले जात होते. आम्ही त्यापेक्षाही कमी सामने खेळलेल्यांसाठी ही सुविधा मागत आहोत.
बीसीसीआयच्या बैठकीत हा विषय तत्त्वतः मान्यही केला गेला होता. मात्र, अद्याप त्यावर प्रत्यक्ष कारवाई झाली नाही. ही चालढकल कशासाठी. या खेळाडूंनाही निवृत्तिवेतन द्यायला हवे. तसेच त्यांचा आरोग्य विमाही उतरवला गेला पाहिजे या व अशा अनेक मागण्या बीसीसीआयकडे करण्यात आल्या आहेत.