नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंची भेट घेत त्यांचा सन्मान केला. असे कौतुक करणारे मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान आहेत. मोदीजी, तुम्ही सर्व क्रीडा विश्वाची मने जिंकली आहेत. या गोष्टी सातत्याने घडल्या तर खेळाडूंचेही मनोबल वाढते व यशस्वी कामगिरीसाठी प्रेरणा मिळते, अशा शब्दांत महान क्रिकेटपटू कपिल देव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या व यश मिळवलेल्या खेळाडूंची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी या खेळाडूंना शाळांमध्ये जाऊन तरुणांना प्रेरित करण्यास सांगितले आणि पालकांनाही क्रीडा क्षेत्रात तरुण पिढीला पूर्ण पाठिंबा देण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदींनी केलेल्या कौतुकाने कपिलही भारावले असून त्यांनी त्यासाठी मोदी यांचे आभारही मानले. अशाच गोष्टींमुळे देशात खेळाडूंमध्ये आत्मविश्वास वाढीला लागेल, असेही कपिल यांनी मत व्यक्त केले आहे.
भारताच्या कोणत्याही पंतप्रधानांनी आपल्या देशात खेळांची संस्कृती निर्माण करायची आहे आणि पालंकांनाही यासंबंधी आवाहन केलेले आहे, असे ऐकिवात नाही. अशी गोष्ट करणारे मोदी पहिलेच पंतप्रधान ठरत आहेत. त्यांनी खेळाडूंच्या पालकांमध्येच नव्हे खेळाडूंमध्येही जोश निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले आहे, असेही कपिल म्हणाले.
एक क्रीडापटू म्हणून क्रीडाजगताला पंतप्रधानांचा पाठिंबा मिळत असल्याचे पाहून मला खूप आनंद झाला आहे. जर आपल्याला भविष्यात अधिक पदके जिंकायची असतील तर आपण खेळाच्या पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. क्रीडापटूंना आवश्यक असलेल्या क्रीडा उपकरणांवर कोणतेही शुल्क आकारले जाऊ नये, असेही मला वाटते. मोदीजी, तुम्ही सर्व क्रीडा विश्वाची मने जिंकली आहेत. जय हिंद, असेही कपिल यांनी नमूद केले आहे.
पंतप्रधानांकडून कपिल यांचाही गौरव
कपिल देव यांच्या विधानाचे कौतुक करत पंतप्रधानांनी देशाला प्रत्येक खेळात कपिलदेव यांच्यासारख्या महान खेळाडूची गरज आहे, असे व्यक्त केले आहे. कपिल यांना धन्यवाद. तुम्ही सर्व क्रीडाप्रेमींसाठी प्रेरणास्त्रोत आहात. आपण सर्वांनी मिळून काम केले पाहिजे आणि येत्या काळात भारतीय खेळ नवीन उंची गाठेल, असे मोदी यांनी कपिल यांच्या विधानावर आपले मत व्यक्त केले.