भारतात क्रिकेट हा खेळ एखाद्या धर्माप्रमाणे मानला जातो. मग या देव्हाऱ्यातील मूर्ती कालानुरूप बदलतही असतात. 1970 च्या दशकात सुनील गावसकर, त्यानंतर जवळपास अडीच दशके सचिन तेंडुलकर आणि आता विराट कोहली. भारतीय संघाचा टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील पाकिस्तानवरील विजय हा याच कोहली नामक देवाचा चमत्कार होता व तो “याची देही याची डोळा’ पाहता आला ते भक्त धन्य होय.
हा विजय एकट्या भारतीय संघाचा किंवा केवळ कोहलीचा नव्हता तर तो संपूर्ण 130 कोटी लोकसंख्येचाही होता. अपेक्षा ही न संपणारी गोष्ट आहे. कोहलीने तीन वर्षे मोठी खेळी केली नाही म्हणून त्याच्यावर टीका करणारे विक्रमादित्य सुनील गावसकर वयाच्या 73 व्या वर्षीही लहान मुलाप्रमाणे सामना जिंकल्यानंतर नाचत होते हेच कोहली या ब्रॅंडचे यश म्हणावे लागेल. गेल्या स्पर्धेत पाकिस्तान संघाने विश्वकरंडक स्पर्धेतील पराभवांचा इतिहास पुसून काढला व भारताचा पराभव केला होता.
रविवारी मेलबर्नवर भारतीय संघाने हा हिशेब चुकता केला. या विजयात तसा खारीचा वाटा अनेकांचा आहे; पण कळसाध्याय ठरली ती कोहलीची खेळी. या एका खेळीने कोहलीही सचिनच्याच जागी जाऊन बसला, असे म्हटले तर ते धाडसाचे ठरणार नाही. विजयासाठी फक्त 160 धावांची गरज तरीही प्रमुख फलंदाजांच्या अपयशामुळे या धावाही एव्हरेस्टसारख्या वाटू लागल्या होत्या. मात्र, कोहलीने हार्दिक पंड्याच्या साथीने केलेली भागीदारी व अखेरचा चेंडू खेळताना रवीचंद्रन अश्विनने दाखवलेला शांतपणा व संयम यादेखील तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण संघात जे स्टार असतात ते खेळले की बाकीचे झाकले जातात तसेच काहीसे घडले व संपूर्ण फोकस कोहलीवरच केंद्रित झाला. पूर्वी चित्रपटात अमिताभ बच्चन असला की अन्य केवळ सपोर्टर बनायचे तसेच कोहलीमुळे या सामन्यात दिसले. पाकिस्तानच्या प्रमुख फलंदाजांवर वर्चस्व राखणारा अर्शदीप सिंग असो किंवा मधल्या षटकांत धावा रोखणारा स्पेल टाकणारा पंड्या असो कौतुक कोहलीचेच होणार होते व झालेही.
विजयाचा पाठलाग करताना एकवेळ 4 गडी गमावून धावसंख्येची तिशी गाठलेल्या भारतीय संघाने त्यानंतर केलेली फलंदाजी शब्दांत वर्णन करणे शक्यच नाही. त्यातही कोहलीने अप्पर कट किंवा पूल करत जे षटकार मारले ते सचिन एकेकाळी मिरवायचा. कोहलीने आपल्या 82 धावांच्या नाबाद खेळीत जे फटके मारले ते पाहून खरा कोहली परतल्याची साक्ष मिळाली. गेले तीन वर्षे हा जुना कोहली कुठेतरी हरवला होता तो काल मेलबर्नवर गवसला. या सामन्यात पाकिस्तान आणि विजय यांच्यात कोहली उभा होता व त्यानेच प्रत्येक चेंडूवर बदलणारी समीकरणे योग्य पद्धतीने हाताळली व विजय संघाच्या पारड्यात टाकला. पाकिस्तानच्या हॅरीस रौफने टाकलेल्या डावातील 19 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर कोहलीने बॅकफुटवरून लॉंगऑनला मारलेला षटकार शारजातील सचिनची आठवण करून गेला. या खेळीदरम्यान कॅमेरा जेव्हा जेव्हा कोहलीच्या डोळ्यांवर येत होता, त्यावेळी कोहलीची देहबोली इतकी सकारात्मक होती की जी यापूर्वी तीन वर्षे एकदाही दिसली नाही. त्याचा तो बॅकफूट पंच, पूल, लॉफ्टेड ड्राइव्ह, कव्हर ड्राइव्ह सगळे फटके पाहून एखाद्या यात्रेनंतर जशी तृप्ती मिळते तशीच आपल्याला मिळाली. हे सगळे फटके त्याच्या भात्यात पहिल्यापासून होते. मात्र, ऐन मोक्याच्या क्षणी तो सगळे काही विसरायचा व एखाद्या क्लब दर्जाच्या खेळाडूप्रमाणे बाद व्हायचा. त्याचे बाद होण्यात गोलंदाजांचा कमी खुद्द कोहलीचाच वाटा जास्त असे. कारण त्याचे गेले तीन वर्षे बाद होणे पाहिल्यावर असेच वाटायचे की तो बेजबाबदार बनत आहे की काय? मात्र, विश्वकरंडक स्पर्धांच्या इतिहासात सचिनप्रमाणे कोहलीही सातत्याने यशस्वी ठरला आहे व तेच त्याने मेलबर्नवर सिद्ध केले.
इंग्रजीत म्हणतात ना, “फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज पर्मनंट’, हा सुविचार कोहलीने खरा करून दाखवला. पूर्वी सचिन बाद झाल्यावर टीव्ही बंद केले जायचे. परंतु जर पहिले चार फलंदाज बाद झाले व सचिन खेळपट्टीवर असेल तर “सचिन आहे ना मग काळजी नाही’, असे वाक्य आपोआप तोंडात यायचे. तीच परिस्थिती कोहलीनेही सार्थ केली. एकवेळ 4 बाद 31 अशी बिकट स्थिती असतानाही “कोहली खेळपट्टीवर आहे ना मग चिंता नाही’, हाच विश्वास चाहत्यांना होता व कोहलीनेही त्यांचा विश्वासघात केला नाही, तर विजयाचा घास पाकिस्तानच्या तोंडातून बाहेर काढला. या स्पर्धेपूर्वी कोहलीला टी-20 संघातून वगळावे अशी टीका सातत्याने होत होती. निवड समितीवरही दडपण वाढत होते कारण कोहलीच्या बॅटमधून पूर्वीप्रमाणे धावाही निघत नव्हत्या. बीसीसीआय व निवड समिती यांच्या गुडबुकमधून कोहली बाहेर जात होता असेच चित्र दिसत होते. त्यातच तत्कालीन अध्यक्ष सौरव गांगुलीसह अन्य स्टार खेळाडूंचीही कोहलीवरील वक्रदृष्टी दिसून येत होती. खुद्द मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही त्याच्यापासून लांब जात होते, असेही बोलले गेले मात्र, या एका खेळीने चमत्कार घडवला व जो टीकेचा धनी बनला होता तोच आता गळ्यातील ताईत बनला.
जगभरात नावाजलेल्या बीबीसीने नेहमीप्रमाणे या सामन्यातील पंचगिरीवर टीका केली. मात्र, पाकिस्तानातील सर्वात प्रसिद्ध वृत्तपत्र असलेल्या “द डॉन’ने कोहलीसह भारतीय संघाचे जगजाहीर अभिनंदन केले यातच सर्वकाही आले. पाकिस्तानचा संघही जिद्दीने लढला मात्र, कोहली व पंड्याच्या त्या एका भागीदारीने हा सामना फिरला. पाकिस्तानच्या गोलंदाजीचा पालापाचोळा करत कोहलीने आपली “किंग कोहली’ ही बिरुदावली सार्थ केली यात शंका नाही. हा विजय केवळ भारतीय संघाची उमेद वाढवणारा नव्हे तर येत्या काळात वर्चस्व आणखी भक्कम करणारा ठरला, असेच म्हणावे लागेल. म्हणूनच आपल्या टीकाकारांना आपल्या खेळीतूनच उत्तर देण्याची पद्धत त्याने सचिनकडून घेतली व सचिनप्रमाणेच कोहलीही आता केवळ क्रिकेटपटू न राहता देशवासीयांची भावना बनला यात शंका नाही.