– अमित डोंगरे
गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिल ज्या पद्धतीने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत फलंदाजी करत आहे ते पाहता त्याच्यासाठी भारतीय संघाची कवाडे उघडणे ही केवळ औपचारिकताच असावी. पण… हाच पण प्रत्येकवेळी संघनिवडीमध्ये येतो. याचे मुख्य कारण आपली कोटा पद्धती. तरीही गिलसाठी असेच म्हणावेसे वाटते की एकदा तरी भारतात होत असलेल्या एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी खरीखुरी गुणवत्ता संघात दिसावी असे वाटत असेल तर गिलला संधी मिळावी.
गिलने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत खोऱ्याने धावा केल्या आहेत. त्यात एक शतकी खेळीही आहे. आत्ता संधी नाही देणार तर कधी देणार. अर्थात ज्या बीसीसीआयकडे पूर्णवेळ निवड समितीच नाही तर ती अपेक्षा करणे योग्य ठरेल का. खरेतर रोहित शर्मा जरी कर्मधार असला तरीही त्याचा सध्याचा सुमार फॉर्म पाहता त्याने सलामीला फलंदाजीला येण्याचा हट्ट सोडावा.
लोकेश राहुल दुखापतीतून पूर्ण बरा कधी होणार याबाबत अद्याप कोणीही सांगू शकत नाही. अशा स्थितीत गिलने ईशान किशनसह डावाची सुरुवात करणेच योग्य ठरेल. त्यानंतर विराट कोहली, रोहित शर्मा असा फलंदाजीचा क्रम लावला तरी काय फरक पडतो.
रोहित धावांच्या तिशीत परततो तर कोहली एखादा चांगला डाव खेळून जातो या पलिकडे सध्या हे दोन्ही फलंदाज आणखी काय दिवे लावत आहेत. मग केवळ नाव मोठं म्हणून त्यांनाच सातत्याने खेळवत राहणे कितपत योग्य आहे. त्यापेक्षा आत्तापासूनच नवोदितांना सातत्याने संधी दिली गेली तरच ते येत्या काळात भारतीय संघाचे भविष्य म्हणून नावारुपाला आलेले दिसतील.
वशिल्याचे तट्टू खेळवत राहण्यापेक्षा ज्यांच्याकडे वय, दर्जा, गुणवत्ता व जिद्द आहे त्यांनाच विश्वकरंडकासारख्या मोठ्या व मानाच्या स्पर्धेत खेळवले गेले पाहिजे. आयपीएल स्पर्धेत गिलने ज्या पद्धतीने फलंदाजी केली आहे ती पाहून खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही प्रभावीत झाला आहे. हे म्हणजे देव प्रसन्न झालाय आता भक्तांनी गिलच्या नावावर शिक्कामोर्तब केले की काम झाले. पण कर्णधार रोहित शर्मा असल्याने तो गिलला किती प्राधान्य देणार हा देखील प्रश्न आहे.
कारण त्याला जर संघाचा विचार असता तर त्याने आयपीएल स्पर्धेतच आपला फलंदाजीचा क्रम एक प्रयोग म्हणून बदलून पाहिला असता. रोहितकडून हे होणार नाही कारण स्वतःची जागा वीरेंद्र सेहवागला द्यायला किंवा रवींद्र जडेजाला द्यायला रोहित म्हणजे सौरव गांगुली किंवा महेंद्रसिंह धोनी नव्हे.