– अमित डोंगरे
भारत व इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत मैदानावरील पंचांच्या निर्णयांवरून सातत्याने टीका होत आहे. मात्र, तरीही आयसीसी किंवा त्यांनी नियुक्त केलेले सामनाधिकारी कोणताही हस्तक्षेप करताना दिसलेले नाहीत. क्रिकेटच्या खेळात पंचांना सोल जज असे म्हटले जाते. पण जर आता तंत्रज्ञानाची मदत होत असतानाही ते सोल जज कसे राहू शकतात.
सत्र न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यालयात दाद मागता येते तर क्रिकेटच्या खेळातील मैदानावरील पंचांच्या निर्णयाला दाद मागताना आयसीसी आचारसंहितेचा इतका बागलबुवा का करते हे समजत नाही. पूर्वी जेव्हा मैदानावरील पंच निर्णय देत होते तेव्हा कोणतेही तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. नंतर तिसरा पंच दाखल झाला तसेच टीव्ही रीप्लेची सुविधा आली व मैदानावरील पंचांच्या चुका अधोरेखित होऊन त्यात सुधारणा करता येउ लागल्या. यामुळे निर्णयक्षमतेत अत्यंत अचूकता कशी येईल याकडे लक्ष दिले जाऊ लागले.
आता तर काय तिसरा पंच देखील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असतो. मैदानावरील पंच तसेच तिसरा पंच यांच्या मदतीला डीआर आले आहे. त्यात फलंदाजी किंवा गोलंदाजी करत असलेल्या संघाला मैदानावरील पंचांच्या निर्णयावर शंका असेल तर तो दाद मागू शकतो व अचूक निर्णय मिळवू शकतो. परिणामी संघाचे होऊ शकेल असे नुकसान टाळताही येते. त्यातील अम्पायर्स कॉल हा नियम सोडला तर या तंत्रज्ञानाच्या मदतीने कित्येकदा हरणारे सामनेही काही संघांनी जिंकल्याची उदाहरणे आहेत.
जेव्हा हे नवनवे तंत्रज्ञान आले तेव्हा काही लोकांनी ओरडा सुरू केली की मैदानावरील पंच काय केवळ षटकातील चेंडू मोजण्यासाठीच ठेवणार का, त्यांच्या उपयुक्ततेची गरज संपणार का. पण जसे विविध वाहिन्या आल्यावरही वृत्तपत्रांचे महत्त्व कमी झाले नाही तसेच कितीही तंत्रज्ञान येऊ द्या मैदानावरील पंचांचे महत्त्व कमी होणार नाही हे निश्चित; परंतु आता वेळ अशी आली आहे की मैदानावरील पंचांना सोल जज म्हणण्याचा काळ संपला हे मान्य केले पाहिजे.
जर कोणतेही तंत्रज्ञान जर अचूक निर्णय देणारे ठरत असेल तर ते जास्तीत जास्त बिनचूक कसे राहील याकडे लक्ष दिले पाहीजे उगीच मैदानावरील पंचांचे महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी अम्पायर्स कॉल वगैरेचे लाड कशाला करायचे. हे एक उदाहरण झाले आता कोणत्याही फलंदाजाला बाद दिल्यावर त्याने साधी निराशाही दाखवायची नाही ही कोणती आचारसंहिता.
भारताच्या लोकेश राहुलला पंचांनी बाद दिले. त्यानंतर त्याने डीआरएस घेतला. मात्र, त्यातही तो बाद असल्याचाच निर्णय कायम ठेवला गेला म्हणून पॅव्हेलियनकडे परतत असताना त्याने आपली निराशा लपवली नाही. लगेच त्याने आचारसंहितेचा भंग केल्याचा कांगावा केला गेला व त्याला सामना रकमेच्या 15 टक्के दंडही करताना डीमेरीट गुणही दिले. असला कसला हा नियम म्हणजे बाद झाल्यावरही आपली निराशाही दाखवायची नाही हा अनाकलनीय नियम कशासाठी.
खेळाडू माणसे आहेत यंत्र नव्हे. त्यामुळे त्यांना भावना आहेत आणि प्रत्येक खेळाडू संघातील स्थान टिकवण्यासाठी तसेच आपली कामगिरी सरस व्हावी यासाठी कठोर मेहनत घेत असतो आणि मैदानावरील पंचांच्या एका चुकीच्या निर्णयावर त्याच्या भवितव्यावर टांगती तलवार येते. त्यानंतर जर त्याने आपली निराशा कोणतेही गैरवर्तन न करता दाखवली तर काय बिघडले. खेळाडूंनी यंत्रवत भावनाहीनपणे खेळ करावा अशी आयसीसीची अपेक्षा आहे का.