-अमित डोंगरे
भारतीय क्रिकेट संघ ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. जर आज जगभरात भारतीय खेळला तरच अन्य प्रतिस्पर्धी संघांना पैसा मिळतो. काही वर्षांपूर्वी ज्या संघाने आपल्या देशात दौराच करू नये असे इंग्लंड व ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य क्रिकेट मंडळांना वाटत होते तेच आता भारतीय संघाने दौरा करावा म्हणून रेड कार्पेट टाकतात. तेच श्रीलंका क्रिकेट मंडळाने केले.
मंगळवारी दुसरा सामना सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाचा अष्टपैलू कृणाल पंड्या करोनाबाधित असल्याचे समोर आल्याने भारतीय संघासह श्रीलंका संघालाही धक्का बसला. हा सामना एक दिवसाने पुढे ढकलला गेला असला तरीही धोका संपलेला नाही. मग याच सावटाखाली केवळ पैशांच्या मोहापायी खेळाडूंच्या जीवाशी खेळ करत ही मालिका का खेळवली जात आहे हा प्रश्न उरतो.
खरेतर भारताचा प्रमुख खेळाडूंचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे, मात्र असे असतानाही दुसरा संघ तयार करत बीसीसीआयने श्रीलंका दौरा निश्चित केला. करोनामुळे गेल्या जवळपास दीड वर्षांत बीसीसीआयसह अनेक देशांच्या क्रिकेट मंडळांना प्रचंड तोटा सहन करावा लागला होता, त्याची कुठेतरी भरपाई व्हावी हाच एकमेव उद्देश ठेवून दौरे आखले जात आहेत. पण एक संघ जर इंग्लंडमध्ये आहे तर दुसरा संघ तयार करत त्याचा काटेरी मुकुट राहुल द्रविडच्या डोक्यावर ठेवून मालिका खेळण्याचा अट्टहास का केला गेला याचे उत्तर खुद्द बीसीसीआयकडेही नाही.
केवळ प्रायोजकता व थेट प्रक्षेपण यांतून प्रचंड पैसा मिळवणे हा एकच हेतू स्पष्ट दिसून येतो. अशी गरज काय निर्माण झाली होती की विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ इंग्लंडमध्ये असताना शिखर धवनच्या डोक्यावर कर्णधारपदाचे ओझे टाकून श्रीलंकेविरुद्धची मालिका आखली गेली. तसेही श्रीलंका दौर्यावर एकदिवसीय व टी-20 मालिका खेळवली जात असून व भारतीय संघाने एकदिवसीय मालिका जिंकलेली असतानाही आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत या मालिकेतील खेळाडूंना भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता अद्याप कोणीही व्यक्त केलेली नाही.
सूर्यकुमार यादव, पृथ्वी शॉ, इशान किशन यांचा अपवाद वगळता अन्य कोणा खेळाडूला प्रमुख संघात स्थान मिळण्याची खात्रीही देता येणार नाही. कर्णधार धवनचेच स्थान संघात राहील का हाच मोठा प्रश्न आहे. दुसरीकडे रवी शास्त्रींना हटवून द्रविडला मुख्य प्रशिक्षक करा ही मागणी होत असली तरीही टी-20 विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत तेच कायम राहतील असे संकेत खुद्द बीसीसीआयच देत असताना या श्रीलंका दौर्ऱ्याचे हशिल काय.
कशासाठी ही मालिका आयोजित केली गेली. त्यातच इंग्लंडवरून परतलेला श्रीलंका संघ काही खेळाडूंना करोनाची बाधा झाल्यामुळे तसेच काही प्रमुख खेळाडूंनी मंडळाच्या करार पद्धतीला विरोध केल्यामुळे प्रचंड कमकुवत बनलेला आहे. अशा स्थितीत ही मालिका त्यांच्या मंडळाला पैसा मिळवून देण्यापलीकडे काहीही उपयोगाची नाही. जी स्थिती त्यांची आहे तीच थोड्या फरकाने बीसीसीआयची आहे. या मालिकेत खेळत असलेल्या खेळाडूंपैकी वर नमुद केलेल्या खेळाडूंपैकीच कोणाला तरी मुख्य संघात स्थान मिळेल. ही मालिका केवळ आणि केवळ पैशांसाठीच खेळली जात आहे हे सांगायला कोणा समिक्षकाची गरज नाही.
द्रविडची ही मुख्य प्रशिक्षकपदाच्या नियुक्तीपूर्वीची टेस्ट ड्राईव्ह असावी असेच वाटते पण ही मालिका जिंकूनही पुढील सहा ते सात महिने तरी शास्त्रींची उचलबांगडी होऊन द्रविडची नियुक्ती केली जाइल ही शक्यताही दिसत नाही मग अशा स्थितीत ही मालिका का आयोजित केली गेली याचे उत्तर मिळेल का.