-अमित डोंगरे
चेन्नईतील पहिली कसोटी गमावल्यानंतर तेथेच झालेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने विजय मिळवला व चार सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. आता दोन्ही संघ तिसरा कसोटी सामना खेळण्यासाठी अहमदाबादला दाखल झाले असून हा सामना प्रकाशझोतात तसेच गुलाबी चेंडूने खेळवला जाणार आहे. खरेतर या प्रकारच्या सामन्यांचा अनुभव भारतीय संघापेक्षा इंग्लंडला जास्त आहे. मात्र, तरीही भारतीय संघ मायदेशात तसेच पाटा खेळपट्टीवर खेळणार असल्याने काही प्रमाणात फायदा भारतीय संघाला होणार अशी अपेक्षा आहे.
या खेळपट्टीला तयार करताना त्यावर हिरवळ होती मात्र, प्रत्यक्ष सामन्यापूर्वी संपूर्ण खेळपट्टी मोवींग करतील व ठणठणीत पाटा करतील. म्हणजे ना जेम्स ऍण्डरसनचे चेंडू स्विंग होतील ना भारतीय फलंदाज आट्यापाट्या खेळतील. ना बजेगा बांस ना बजेगी बांसूरी. त्या मानाने भारतीय गोलंदाजी मायदेशातील तसेच विशेषतः मोटेराच्या या खेळपट्टीवर पाहुण्यांपेक्षाही जास्त यशस्वी होतील असे दिसत आहे.
मोटेराचा इतिहास तसा भारतीय संघाच्या बाजूने आहे पण चेन्नईवरच्या पहिल्या कसोटीत हाच इतिहास इंग्लंडने खोटा ठरवला होता. त्यामुळे क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेने भरलेला असतो असे सांगतात ते काही खोटे नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत इंग्लंडला कमी लेखून चालणार नाही.
या खेळपट्टीवर पहिले दोन दिवस वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल हे तर उघड आहे कारण सामना प्रकाशझोतात खेळवला जाणार आहे. त्यातच नंतरचे तीनही दिवस जरी फलंदाजांसह फिरकी गोलंदाजांना काहीशी मदत मिळणार असली तरीही ऍण्डरसन किंवा जसप्रीत बुमराह यांनाही स्विंग मिळेल. त्यातच जर भारतीय संघात महंमद सिराजला खेळवले तर त्याचे स्विंग भारतीय संघासाठी बोनस ठरतील.
प्रश्न गोलंदाजांच्या कामगिरीपेक्षाही जास्त फलंदाजांच्या कामगिरीचा आहे. इंग्लंडच्या फलंदाजांना दिवसरात्र सामन्यात फलंदाजी करण्याचा अनुभव जास्त असल्याने त्यांच्या धावसंख्येवर अंकुश राखण्याचे आव्हान भारतीय संघासमोर आहे. मात्र, त्याही पेक्षा मोठा प्रश्न आहे तो भारतीय फलंदाजीचा. भारताच्या आत्ताच्या संघात संघात चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली व काही प्रमाणात सलामीवीर शुभमन गिल हे स्विंग गोलंदाजी चांगली खेळू शकतात.
रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे स्विंगसमोर गरबा खेळतात हे चेन्नईतही दिसून आले त्यामुळे पुजारा व कोहलीनंतर संघाच्या फलंदाजीची मदार जिद्दी ऋषभ पंत व जर संघात स्थान दिले तर हार्दिक पंड्या यांच्यावरच राहणार आहे. या सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले तर त्यांच्या फलंदाजांची स्विंग गोलंदाजीसमोर उडणारी भंबेरी पाहता येईल. मात्र, त्यासाठी कोहलीला नाणेफेक जिंकावी लागणार आहे.
तसेही कसोटी सामना मग तो कुठेही असे त्यात नाणेफेक जिंकणे खूपच महत्त्वाची असते. तसेच खेळपट्टी, वातावरण किंवा हवामान कसेही असो पहिल्यांदा फलंदाजी करणेच योग्य ठरते कारण मग चौथ्या डावात फलंदाजी करावी लागत नाही. पाहु या या कसोटीत तरी कर्णधार कोहली नाणेफेक जिंकण्यात यशस्वी होतो का. म्हणजेच भारतीय ड्रेसिंगरुमच्या दिव्यांखाली अंधार होणार का भारतीय फलंदाजीवर प्रकाशझोत पडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.