-अमित डोंगरे
महेंद्रसिंग धोनी, सिर्फ नाम ही काफी है. असे त्याला संबोधले जात होते. त्याचे यश, त्याचे निर्णय सर्वकाही त्याने फासे टाकल्यासारखे यशाच्या पारड्यात पडत होते. पत्ता चालणे हे वाक्य ज्यांना समजते त्यांना मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय ते लक्षात येईल.
एखाद्याचे नशिब जोरावर असले की तो जे काही करतो त्याला राजाश्रयाबरोबरच लोकाश्रयही मिळतो. तेच धोनीच्याबाबतीत गेली अनेक वर्षे घडले. तो यायचा व तोच जिंकायचा हे सूत्र ठरलेले होते. मग अचानक माशी शिंकली. त्याच्या कामगिरीला त्याच्या कतृत्वाला ग्रहण लागले. अत्याधुनिक क्रिकेटमधील अत्यंत हुशार कर्णधार अशी ओळख आता तोच पुसून टाकत आहे. आत्मसन्मान टीकवणे देखील त्याला जड जात आहे.
भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार, आयसीसीच्या तीन मोठ्या स्पर्धा जिंकून देणारा बेस्ट फिनिशर या व अशा अनेक उपाध्यांनी त्याला गौरवण्यात आले; पण यंदाची आयपीएल स्पर्धा व त्यातील त्याचे नेतृत्व आणि चेन्नई सुपर किंग्जची खालावलेली कामगिरी पाहिली की असे वाटते धोनीने स्वतःचा अपमान किंवा मानखंडना करून घेण्यासाठीच तर या स्पर्धेत सहभाग घेतला नाही ना. त्याचा मैदानावरील कॅप्टन कुल हा मुखवटा केव्हाच गळून पडला आहे आणि आता राहिलाय तो डीप्रेशनमध्ये गेलेला एक सामान्य खेळाडू.
त्याला ना वेगाने धावा जमवता येत आहेत, ना त्याचे नेतृत्त्व पहिल्यासारखे होत आहे, ना त्याचे संघावर नियंत्रण आहे. त्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर सध्या त्याचे फासे उलटेच पडत आहेत. त्याचे चाहते मान्य करणार नाहीत; पण तो या स्पर्धेत स्वतःचा अपमान करवून घ्यायलाच खेळत आहे की काय अशी शंका येते. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत तो खेळणार म्हणून त्याचे चाहते प्रचंड सुखावले होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आधी त्याने विश्रांती घेतली, मग दीड वर्षे विजनवासातही गेला. मग अचानक त्याचा चेन्नईच्या सराव सत्रात उदय झाला. त्याला अचानक साक्षात्कार झाला असावा की आयपीएल स्पर्धेत खेळलेच पाहिजे. हे असे अनाकलनीय निर्णय घेण्याचा खरेतर त्याचा स्वभावच नाही. पण म्हणतात ना तुम्ही चुकीचे असला की तुमची प्रत्येक भूमिका गैरसमजुतीतच राहते. जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हा तूमचे प्रत्येक वाक्य सुविचार ठरते. ही स्थिती धोनीने अनुभवली व त्याच्या उलट परिस्थिती तो आज अनुभवत आहे.
यंदाच्या स्पर्धेत त्याच्या नेतृत्वाखालील संघ व त्यातील खेळाडू तेच होते की ज्यांनी आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात वर्चस्व राखले. मात्र, आता त्यांचे वय झाले आहे, खुद्द धोनीही चाळीशीकडे झुकलेला आहे. अशा स्थितीत शेर बुढा हो गया असेच म्हणावे लागेल. संघाच्या सततच्या पराभवावर बोलताना त्याने संघातील नव्या खेळाडूंमध्ये चमक नसल्याचे सांगून स्वतःची किंमत आणखीनच कमी करून घेतली. जर संघातील नव्या खेळाडूंमध्ये चमक नव्हती तर संघ लिलावात बोली लावत होता तेव्हा धोनी निद्रादेवीच्या कुशीत होता का असा प्रश्न पडतो.
परिस्थिती कशी बदलते पाहा, एक काळ होता की धोनीला जो संघ दिला जात होता त्यातून हा रत्नपारखी विजेता संघ घडवत होता. आणि आता जो विजेता संघ त्याच्या हाती आहे त्याला एकेक सामना जिंकतानाही कष्ट पडत आहेत. कोणत्याही खेळाडूची कारकीर्द जास्तीतजास्त 10 वर्षे असते असे म्हणतात. डेसमंड हेन्स किंवा सचिन तेंडुलकरसारखे काही अपवाद वगळले तर सर्वांच्या नशिबात अत्यल्प कारकीर्दच असते.
धोनी त्याबाबतीतही नशिबवान ठरला होता. मात्र, इंग्लंडमध्ये गेल्या वर्षी झालेली विश्वकरंडक स्पर्धा त्याच्या कारकिर्दीवर पूर्णविराम देणारी ठरली. रबर ताणावे तशी त्याने आयपीएलसाठी कारकिर्द ताणली असली तरीही ती येत्या काळात तूटलेलीच दिसणार आहे. यंदाच्या स्पर्धेत सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव करत थाटात सुरुवात करणारा चेन्नईचा संघ धोनीच्या डोळ्यांदेखत कोसळत होता. त्याच्या आत्मविश्वासाचीही या स्पर्धेत पडझड झाली. अखेरच्या सामन्यांमध्ये त्यांची कामगिरी उंचावली पण तोपर्यंत वेळ गेली होती. यालाच उशिरा सुचलेले शहाणपण म्हणत असावेत.