-अमित डोंगरे
भारताच्या गोलंदाजीची अवस्था पहिल्यावर असे वाटते की आर. अश्विन, वॉशिंग्टन सुंदर व शाहबाज नदिम यांच्यासह वेगवान गोलंदाजांनीही पुढील डावासह उरलेल्या तीनही कसोटींसाठी इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट व बेन स्ट्रोक्ससाठी खास योजना तयार करायला हवी. केवळ ऑनलाईन पत्रकार परिषदेत नदिमला पाठवून रवी शास्त्री व विराट कोहली यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना टाळणे योग्य नाही.
अश्विन, सुंदर व नदिम यांनी मिळून सव्वाशेपेक्षा जास्त षटके गोलंदाजी केली आणि जवळपास 400 धावांच्या बदल्यात सात गडी बाद केले. हे चित्र भारतात सुरू असलेल्या कसोटीतील वाटत नाही. परदेशात असा जोगवा मागावा लागतो. इथे फलंदाजाचे फुटवर्क चुकले तर त्याला नाचवायला अश्विन पुरेसा आहे. पण त्याचे चेंडू कसे खेळायचे याचा अभ्यास अत्यंत काटेकोरपणे करूनच इंग्लंडचा संघ भारतात दाखल झाला आहे, हे सहज कळून येते.
त्यांनी पहिल्या डावात साडेपाचशे पेक्षा जास्त धावा करून आव्हान उभे केले असे त्यांना वाटत असले तरीही आपणही असेच शिखर उभे करु शकतो. मात्र, त्यासाठी आपल्या फलंदाजांचे शॉट सिलेक्शन सुधारणे गरजेचे आहे. हिटमॅन रोहित शर्मा, शुभमन गिल, कर्णधार विराट कोहली ज्या पद्धतीने बाद झाले ते पाहता त्यांची शाळा घ्यावी का. नेटमध्ये फलंदाजीचा सराव करताना शास्त्री पंच उभा राहतो तेथे उभे राहतात का असा प्रश्न पडतो.
खरेतर त्यांनी फ्रंटफुट व बॅकफुटवर आपले फलंदाज कसा सराव करतात ते पाहायला हवे. इंग्लंडचे फिरकी गोलंदाज यतातथाच आहेत, यात वाद नाही. पण मग जेम्स ऍण्डरसन, जोफ्रा आर्चर व डॉमनिक बेस यांच्या गोलंदाजीवर चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत ज्या पद्धतीने खेळत होते ते कोहली, रोहितला का जमले नाही. त्यांच्याकडे तर नैसर्गिक आक्रमकता आहे. असो, पाटा खेळपट्टीवर जिथे अद्याप क्रॅक डेव्हलप झालेल्या नाहीत तिथे आपण किमान 400 धावा करणे गरजेचे आहे.
दुसरा डाव सुरू झाल्यावर सामना आपोआप अनिर्णित अवस्थेकडे झुकेल. ज्या व्ही. रमेश कुमार या सो-कॉल्ड पिच क्युरेटरने ही विकेट तयार केली त्याचा भारतीय नव्हे तर जागतिक पातळीवर सत्कारही करायला हवा. ही खेळपट्टी फलंदाज कि गोलंदाज कोणाला लाभदायक ठरेल असे भाकित व्यक्त करताना त्याचे डिप्लोमॅटिक उत्तर दिले होते.
पहिले दोन दिवस वेगवान गोलंदाजांना, तर उरलेले तीन दिवस फिरकी गोलंदाजांसह फलंदाजांनाही. मात्र, ज्यो रूटने बेन स्टोक्सच्या साथित ज्या पद्धतीने आपला डाव आखला व भागिदारी केली त्यावरून ही जोडी या संपूर्ण मालिकेत आपली डोकेदुखी वाढवणार आहे. विथ द टर्न आणि अगेन्स्ट द टर्न ते फिरकीला चांगले खेळत आहेत. स्ट्रोक्सने अश्विनला मारलेला षटकारच खूप काही सांगून गेला. याच मालिकेत आता हा सामना सोडला तर अजून उरलेले तीन सामने आपल्या गोलंदाजांना कोहली आणि संघातील वरिष्ठ खेळाडूंकडून मार्गदर्शन घेत रूट व स्ट्रोक्ससाठी योजना तयार करणे महत्त्वाचे आहे.
अशा फलंदाजांना एक संधी देणे महागात पडू शकते.
चार वर्षांपूर्वी इंग्लंडने आपल्याला आपल्याच भूमित पराभूत केले होते. त्याची पूनरावृत्ती होऊ नये असे वाटत असेल तर त्यांनी पहिल्या डावात केलेल्या फलंदाजीपासून बोध घ्यायला हवा आणि नदिमसारख्या नवोदितांना कोणत्या संघाविरुद्ध आणि कोणत्या मैदानावर संधी द्यावी याचाही विचार केला जावा.
संघातील अन्य प्रमुख गोलंदाज दुखापतीने जायबंदी असतील तर वेगळी गोष्ट आहे. पण दुखापत खरी आहे का मॅनेज केलेली हे देखील पाहिले जावे. निवड समिती, संघ व्यवस्थापन, प्रशिक्षक व कर्णधार याची उत्तरे देतील का आणि इंग्लंडच्या फलंदाजीला कसे रोखायचे याची उत्तरे शोधतील का हाच काय तो प्रश्न आहे.