-अमित डोंगरे
भारतीय संघाविरुद्ध भारतातच खेळणे किती कठीण असते याचा अनुभव आता इंग्लंडच्या संघाला या सामन्यात आला असेल. पहिल्या सामन्यात त्यांनी जो विजय मिळवला त्याचे महत्त्व कमी करण्याचा हा कोणताही प्रयत्न नाही. मात्र, त्या सामन्यात फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीकडून कोणतीही मदत मिळत नव्हती. त्यामुळेच इंग्लंडच्या धावांवर भारताला अंकुश राखता आलेला नव्हता. दुसरा सामना त्याला अपवाद ठरला. पहिल्या डावात भारताने त्रिशतकी धावसंख्या उभारली होती. ही धावसंख्या कमी ठरेल का, अशी एकीकडे शंका येत असताना इंग्लंडच्या पहिल्याच डावाला रवीचंद्रन अश्विनने घरघर लावली. आता त्यांना खरेतर डाळ-आट्याचे भाव कळू लागले असतील.
व्ही. रमेश कुमार या नावाच्या अननुभवी व्यक्तीने चेन्नईची पहिल्या कसोटीची खेळपट्टी तयार करत भारतीय संघालाच अपयशाच्या गर्तेत लोटले होते. त्यातून भारतीय संघाचा पाय फलंदाजांच्या अपयशाने चांगलात गोत्यात गेला होता. त्यानंतर खेळपट्टीवर पाणी कमी फवारले गेले. त्यामुळे ही खेळपट्टी फलंदाजांना तर लाभदायक ठरलीच पण दुसऱ्याच दिवसापासून फिरकीसाठीही अनुकूल ठरली. त्यातच पाहुण्या संघाचा कर्णधार ज्यो रूटला पहिल्या कसोटीतील द्विशतकी खेळी केल्यावर या सामन्यात मात्र, त्याला जाळ्यात पकडण्यात यश आले.
क्रिकेटची मानसिकता आपली देखील इंग्लंडसारखीच आहे. एकाच खेळाडूवर ते देखील अवलंबून राहतात व आपणही. या सामन्यात त्यांचा रूट अपयशी ठरला तर संपूर्ण संघ कोसळला. आपल्याकडे पूर्वी सचिन बाद झाल्यावर व आता कोहली किंवा रोहित बाद झाल्यावर संघ कोसळायचा. त्यात समाधानाची एकच गोष्ट की निदान कसोटी सामन्यात तरी चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत व काही प्रमाणात अजिंक्य रहाणे आपला वाटा उचलतात. त्यामुळे संघाची प्रतिष्ठा तरी वाटते.
त्यांच्या फलंदाजांना आज ईशांत शर्मा व महंमद सिराजची गोलंदाजी खेळणे कठीण गेले. त्यापेक्षाही जास्त त्यांच्या मर्यादा अश्विन, कुलदीप यांनी उघड्या पाडल्या. पहिल्या दिवशी त्यांचा फिरकी गोलंदाज मोईन अलीने कोहलीसह एकूण चार भारतीय फलंदाजांना चकवले. ते पाहून अश्विनलाही हुरूप आला की ही खेळपट्टी त्याच्याही प्रेमात पडेल. चेन्नईत त्याचा व्हॅलेन्टाईन डे साजरा होईल. त्याने सिबली, लॉरेन्स, सर्वात धोकादायक बेन स्टोक्स यांना बाद करत भारताच्या मार्गातील काटे दूर केले. तर अक्सर पटेलने रूटचा अडसर दूर करत त्यांच्या धावसंख्येला लगाम लागेल याची काळजी घेतली.
खरी कसोटी तर आता पुढे आहे. या डावात मोठी आघाडी घेतल्यावरही आपण गाफिल राहून चालणार नाही. दुसऱ्या डावातही जबाबदारीने फलंदाजी करत त्यांच्यावर दडपण कायम राखावे लागेल. पहिल्या डावात त्यांची फलंदाजी दडपणाखालीच कोसळल्याने त्यांना हा सामना आता जिंकण्यासाठी नव्हे तर वाचवण्यासाठी खेळावे लागेल. हाच भारतीय संघाचा नैतिक विजय ठरणार आहे.
ही कसोटी संपल्यावर दोन्ही संघ अहमदाबादला उर्वरित दोन कसोटी सामने खेळण्यासाठी रवाना होतील. तिथे दाखल होण्यापूर्वी या मालिकेत 1-1 अशी बरोबरी असेल तर मोटेरावर भारतीय संघ इंग्लंडच्या फलंदाजांना आट्यापाट्या खेळायला लावू शकतो, हा विश्वास आहे. कारण मोटेराची नव्या मैदानाची खेळपट्टी आपली परंपरा सोडणार नाही. तिथे आपल्या गोलंदाजांना खेळपट्टीला प्रपोज करावे लागणार नाही तर ती स्वतःचा प्रेमात पडलेली दिसेल.