– अमित डोंगरे
भारतीय संघाने दुसरा टी-20 सामना जिंकत इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत बरोबरी केली असली तरीही अद्याप अनेक गोष्टीत सुधारणा तसेच परिपक्वता येणे आवश्यक आहे. त्यातही शॉट सिलेक्शनमध्ये कमालीची सुधारणा होणे महत्त्वाचे आहे.
टी-20 मध्ये तंत्रशुद्ध फलंदाजी उपयोगाची ठरत नाही असे म्हणतात; पण फलंदाजीत अचूक तंत्र असेल तरच या अत्यंत वेगवान क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाजी करता येते हे देखील सत्य आहे. मालिकेत बरोबरी केली याचा आनंद तर आहेच पण या विजयानंतरही काही प्रश्न अनुत्तरीतच राहिले आहेत.
पहिल्या सामन्यात सलामीवीर लोकेश राहुल व शिखर धवन हे ज्या पद्धतीने बाद झाले ते पाहता त्यांच्याकडे संयम नावाची गोष्ट तरी आहे का? असा प्रश्न पडतो. पहिल्या सामन्यात झालेल्या चुका याही सामन्यात दिसून आल्या फक्त या चुका करणारे चेहरे बदलले.
भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला कमी धावात रोखले त्यामुळे दुसरा सामना जिंकताना भारताला सोपे ठरले. त्यातच पदार्पण करत असलेला इशान किशन व कर्णधार विराट कोहली यांनी अफलातून फलंदाजी केली परंतू इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणते या सामन्यात कोहलीसह अन्य फलंदाजांचेही शॉट सिलेक्शन अत्यंत सुमार होते. पहिल्या सामन्यात शिखर धवन, लोकेश राहूल, कर्णधार कोहली, ऋषभ पंत व हार्दिक पंड्या यांनी जे फटके मारत आपल्या विकेट गमावल्या त्यात सुधारणा झाली नाही तर संघाला भविष्यात मोठे नुकसान होऊ शकते. दुसरा सामनाही त्याला अपवाद नाही. टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या किशनने अर्धशतक झळकावले मात्र, तो ज्या पद्धतीने बाद झाला ते पाहता चिंता वाटू लागली.
खेळपट्टीवर स्थिरावलेला असताना तसेच धावाही होत असताना जे फटके खेळले त्याची गरज होती का असा प्रश्न पडतो. ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, राहुल, कोहली यांचे शॉट सिलेक्शन तर अत्यंत सुमार होते.
किशनने थाटात अर्धशतकी खेळी केली तसेच पंतनेही आपण भरात असल्याचेही सिद्ध केले मात्र, ज्या पद्धतीने ते बाद झाले ते पाहता त्यांनाही समज देणे गरजेचे आहे. आऊट साइड ऑफ ऑफ स्टम्प किंवा हाफ व्हॉली, आऊट स्विंगर या चेंडूवर खेळताना केवळ बॅटचा पुश करण्यापेक्षा वीरेंद्र सेहवागसारखे टोलवणे जरी जमले तरीही आपला शॉट सिलेक्शनचा प्रश्न सहज मिटेल.
एकीकडे राहुल द्रविडची शिकवणी घेतलेला किशनही जेव्हा अशा अनाकलनीय शॉट सिलेक्शनवर बाद होतो तेव्हा आश्चर्य वाटते. टी-20 क्रिकेटमध्ये लेफ्ट अलोन करणे भ्याडपणाचे लक्षण मानले जाते किंवा चेंडू निर्धाव गेला तसेच केवळ प्लेड केला तर तो मोठा गुन्हा ठरतो. पहिली दोन तीन षटके गोलंदाजांचा व खेळपट्टीचा अंदाज घेण्यात गेली तरीही त्याने नुकसान काही होणार नाही. या बरोबरच आणखी काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. त्या म्हणजे यष्टीमागची पंतची कामगिरी, राहुल, अय्यर, सूर्यकुमार यादव, वॉशिंग्टन सुंदर व यजुवेंद्र चहल यांच्या क्षेत्ररक्षणात सुधारणेला खूप वाव आहे.