-अमित डोंगरे
ऑस्ट्रेलियावरुन परतलेल्या भारतीय संघाच्या जिद्दीचे कौतुक सुरू झाले व त्याचवेळी इंग्लिश संघ भारतभूमीत दाखल झाला होता. हा नवा इंग्लंड संघ वाटत आहे. जो आशियाई खेळपट्ट्यांचा व वातावरणाचा प्रदीर्घ अभ्यास करून आला आहे. ही खेळपट्टी व्हि. रमेश कुमार या माणसाने तयार केली होती. यापूर्वी त्याने साधी क्लब दर्जाचीही खेळपट्टी तयार केलेली नव्हती. ही कसोटीची खेळपट्टी निश्चितच नव्हती हे कोणीही सांगू शकेल. पण त्याहीपेक्षा जास्त निकृष्ट दर्जाची मानसिकता भारतीय संघातील काही फलंदाजांची होती.
शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर आणि रवीचंद्रन अश्विन यांचा आपवाद वगळता अन्य एकही फलंदाज या सामन्यासाठी मानसिकरीत्या तयार होता किंवा आहे असे वाटतच नव्हते. रमेश कुमारला तमिळनाडू क्रिकेट संघटनेने मागवलेल्या अर्जातून या पहिल्या कसोटी सामन्याची खेळपट्टी बनवण्याचे कंत्राट दिले होते की भारतीय खेळपट्ट्यांची पुन्हा एकदा जागतिक बदनामी करण्याचे कंत्राट दिले होते याचा शोध घेतला पाहिजे. मुळातच बीसीसीआयच्या नियमात अशा अननुभवी व्यक्तीकडून खेळपट्टी बनवणे नियमांत बसणारे आहे का.
कसोटी सामन्यात गुड टॉस टू विन असे का म्हणतात ते चाहत्यांना लक्षात आले असेल. इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतली. ज्या खेळपट्टीचा अनुभव नाही, माहिती नाही, अभ्यास नाही त्यावर कधीही पहिल्यांदा फलंदाजी करणे त्या मनाने सोपे ठरते कारण मग चौथ्या डावात फलंदाजी करावी लागत नाही. या खेळपट्टीवर चौथ्या डावात व पाचव्या दिवशी कशी फलंदाजी करायची याचे धडे नवोदित गिलने दिले याहून मोठी शोकांतिक किंग कोहलीसह बलाढ्य भारतीय फलंदाजांसाठी कोणतीही नसेल. जॅक लीच हा काही शेन वॉर्न नाही पण त्याने खेळपट्टीच्या रफ पॅचचा चांगला उपयोग करुन घेतला. अर्थात, जेम्स ऍण्डरसनला कुठेही कमी लेखायचे नाही. त्याने रिव्हर्स स्विंगचे जे प्रदर्शन केले त्याला तोड नव्हती. त्याची गोलंदाजी पाहून काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाची दांडी अशीच रिव्हर्स स्विंगच्या जोरावर सायमन जोन्सने केलेल्या गोलंदाजीची आठवण आली.
कर्णधार कोहलीने दुसऱ्या डावात खेळपट्टीवर उभे राहण्याची जिगर दाखवली पण तो पर्यंत वेळ निघून गेली होती. हीच जिगर व जिद्द कोहली, रोहित, रहाणे यांनी पहिल्या डावात दाखवायला हवी होती. वेळेवर केलेली कोणतीही गोष्ट यश मिळवून देणारी ठरते. पहिल्या डावात इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्याचा जरी अभ्यास केला असता तरीही आपल्या पहिल्या चार फलंदाजांनी सहज शतके फटकावली असती.
आपल्या जसप्रीत बुमराह व इशांत शर्मा यांनी इंग्लंडच्या पहिल्या डावात गोलंदाजीची सुरूवातही राउंड दी विकेट का केली हे समजले नाही. डावखुरा फलंदाज समोर आहे म्हणून एक अँगल क्रिएट करण्यासाठी अशी गोलंदाजी केली जाते पण पहिल्याच स्पेलमधील षटके अशी का टाकली गेली याचे उत्तर प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री देतील का.
सोडलेले झेल आणि अत्यंत अनाकलनीय फिल्ड प्लेसमेंटमागे कोहलीने नक्की काय विचार केला होता किंवा काहीच विचार केला नव्हता का असे अनेक प्रश्न निर्माण होतात. असो, आता “बैल गेला व झोपा केला’ असे करण्यात काय अर्थ आहे. दुसरी कसोटी देखील याच मैदानावर होणार आहे. त्यात आपण कोणता संघ खेळवतो, तो कशी कामगिरी करतो यावर लक्ष राहील.
एक गोष्ट मात्र, सूर्यप्रकाशाइतकीच स्वच्छ आहे ती म्हणजे या सामन्यासाठी भारतीय संघ मानसिकरीत्या तयार तर नव्हताच पण ही खेळपट्टीही कसोटी सामन्यासाठीची नव्हती. आता भारतीय संघ हरला म्हणून टीका करत असल्याचे बोलले जाईल पण तेच खरे आहे. पराभव इंग्लंडचा झाला की भारतीय संघाचा ते तुम्हीच ठरवा पण अत्यंत दुर्लक्षामुळे व कॅज्युअल अप्रोचमुळे केलेली या सामन्याची खेळपट्टी क्रिकेटचाच पराभव करुन गेली हे मात्र खरे…