अमित डोंगरे
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताच्या प्रमुख फलंदाजांनी केलेली फलंदाजी पाहता त्यांना कसोटी क्रिकेट नकोसे वाटू लागले आहे, का असा प्रश्न विचारावासा वाटत आहे. जर इतक्या बेजबाबदारपणे कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे आपली विकेट बहाल करणार असतील तर मग डाव सावरण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असलेल्या रवींद्र जडेजालाच मधल्या फळीत खेळवावे.
या कसोटीत रोहितच्या साथीने लोकेश राहुलने भारताच्या डावाचा प्रारंभ केला. काउंटी क्लबविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात राहुलने शतकी खेळी केली होती. त्यामुळे कोहलीचा त्याच्यावरचा विश्वास वाढला. त्यानेही निराश केले नाही. एकीकडे भारताचे प्रमुख फलंदाज पाठोपाठ बाद होत असताना राहुलने मात्र नांगर टाकला व खेळपट्टीवर ठाण मांडले.
त्याने ज्या पद्धतीने जेम्स अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉड यांच्या स्विंग गोलंदाजीचा सामना केला, त्याचे वर्णन करणे शक्य नाही. त्याच्या फलंदाजीचे रेकॉर्डिंग कोहली, रोहित, रहाणे व पुजाराने पाहावे म्हणजे अनुभव नसला तरी धमक दाखवता येते हे सहज लक्षात येईल.
कोहली केवळ मैदानावर तोंडाची हवा वाया घालवतो. संतापणे, चिडचीड करणे, आपल्या संघातील खेळाडूवर मोठ्या आवाजात ओरडणे हे असले उद्योग करण्यातच सध्या तो धन्यता मानत आहे. कोणी एकदा काय त्याला “सचिन तेंडुलकरचा वारसदार’ म्हणले तर हा लगेच शेफारून गेला असेच वाटत आहे. कोहलीला अद्याप वीरेंद्र सेहवाग होता आलेले नाही. तर सचिन हा खूपच लांबचा पल्ला आहे.
जे कोहलीचे बाद होणे अनाकलनीय होते तीच अवस्था रोहितच्या बाबतही आहे. त्याने गेल्या चार डावांत धावांची तिशी पार केली. मात्र, त्याचे मोठ्या खेळीत रुपांतर करणे त्याला शक्य झालेले नाही. इतकेच नव्हे तर सलामीला फलंदाजी करताना समोरच्या संघातील गोलंदाजांवर वर्चस्व राखत धावांचा वेगही वाढवायचा असतो. त्याचवेळी आपली विकेटही शाबूत ठेवायची असते. यातील कोणतीही गोष्ट त्याच्याकडून होताना दिसत नाही.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणारा पुजारा सध्या गोंधळलेला दिसतो. फ्रन्टफुटवर खेळायचे की बॅकफुटवर याबाबत तोच शाश्वत नसतो. पहिल्या डावात तो ज्या चेंडूवर बाद झाला त्यावर यापूर्वी तो कधी बाद झाल्याचे दिसलेले नाही. चौथ्या क्रमांकावर कोहली फलंदाजीला येतो. या यामन्यात तो सलामी करणार असे सागितले गेले होते, पण प्रत्यक्षात ते घडले नाही.
हिरव्या गार खेळपट्टीवर नव्या चेंडूवर इंग्लिश वातावरणात सलामीला खेळण्याची धमक कोहलीने दाखवली नाही हे खरे असले तरीही ते कोणी मान्य करणार नाही. कारण आपल्याला आपल्याच संघाची समिक्षा केलेली रुचत नाही. आपण खेळाडूला खेळाडू समजण्यापेक्षा लार्जर दॅन लाईफ समजतो व तिथेच अपयशाचे धनीही होतो.
जर पहिले पाच फलंदाज मिळून दीडशे धावाही करणार नसतील तर मधल्या फळीत जडेजा, रवीचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, महंमद शमी, जसप्रीत बुमराह यांना खेळवावे आणि तळातील फलंदाज म्हणून कोहली, पुजारा, रोहित व रहाणे यांना फलंदाजी करायला लावावी. ऋषभ पंतबाबत आपण पामर काय बोलणार त्याच्या कारकीर्दीची तोच वाट लावत आहे. इतकी मोठी संधी मिळालेली असतानाही तो अजूनही बेजबाबदार पद्धतीने बाद होत आहे तर त्यावर मत तरी काय व्यक्त करायचे.