-अमित डोंगरे
सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अमिताभ बच्चन आणि महेंद्रसिंग धोनी यांना पर्याय नाही, असे म्हटले जाते. ते खोटे नाही, पण तरीही धोनीला पर्याय कोण ? या प्रश्नाचे कवित्व यंदाच्या आयपीएल स्पर्धेतही सुरू असल्याने असा कोण खेळाडू आहे. जो धोनीचा पर्याय म्हणून समोर येईल हे स्पर्धा पार पडेपर्यंत स्पष्ट होणार याची खात्री निश्चितच आहे.
करोनाचा धोका अद्याप कायम असतानाही सुरू झालेल्या आयपीएल स्पर्धेत देशातील नवोदित खेळाडूंनी आपला ठसा उमटवला आहे. मात्र, ही स्पर्धा सुरू झाल्यापासूनच माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला पर्याय ठरेल, असा यष्टिरक्षक फलंदाज भारतीय संघाला गवसेल का, हा प्रश्न सर्वात जास्त विचारला जात आहे.
पर्यायी यष्टिरक्षक लोकेश राहुल, वृद्धिमान साहा, संजू सॅमसन, ऋषभ पंत आणि इशान किशन हे पर्याय समोर येत आहेत. राहुलकडे फलंदाजीसह यष्टिरक्षणाचीही जबाबदारी यापूर्वीच सोपवली गेली होती. मात्र, आता भारतीय संघाला पूर्णवेळ यष्टिरक्षक गवसणे आवश्यक आहे.
या स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या सामन्यांत राहुल, सॅमसन, पंत व किशन यांनी सातत्याने कामगिरी केली आहे. त्यातही फलंदाजीबाबत बोलायचे झाले तर हे चारही खेळाडू भरात आहेत. मात्र, तरीही धोनीचा पर्याय म्हणून इशान किशनच जास्त योग्य वाटतो. किशन मुंबई इंडियन्सकडून, राहुल पंजाबकडून, सॅमसन राजस्थानकडून तर पंत दिल्लीकडून खेळत आहेत व त्यांची कामगिरीही सरस होत आहे. मात्र, असे असले तरीही धोनीची जागा घेईल, असा विश्वास सध्यातरी किशनच्याच कामगिरीतून जाणवतो.
यापूर्वी अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सॅमसन व पंतला संधी दिली गेली आहे. त्यांच्याकडे गुणवत्ता आहे हे सगळेच सांगतात, पण ती वारंवार संधी देऊनही सिद्ध होत नसेल तर किशनच्या नावाचा विचार करायला काय हरकत आहे. पंत भारतीय संघाच्या निवड समितीचा जावई आहे का, असा प्रश्न निर्माण होतो.
सॅमसनलाही संधी दिली गेली आहे, पण त्यालाही अपयशच येत आहे. राहुलने सलामीवीर फलंदाजासह यष्टिरक्षणाचीही जबाबदारी काही सामन्यांत पेलली आहे, पण त्यालाही काही मर्यादा आहेत. तो प्रथम फलंदाज आहे व नंतर पर्यायी यष्टिरक्षक. त्यामुळे त्याच्याच खांद्यावर सगळा भार टाकणे योग्य नाही.
सध्या या स्पर्धेत आश्वासक वाटेल असा यष्टिरक्षक फलंदाज केवळ किशनच आहे. खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली व लास्ट बट नॉट द लीस्ट खुद्द धोनीनेही किशनचे कौतुक केले आहे. त्यामुळे किशनला आता अन्य कोणत्या प्रशस्तीपत्रकाची गरज नाही. या स्पर्धेतील बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात त्याने मुंबईकडून 99 धावांची केलेली खेळी अनेकांनी पाहिली असेल. त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी आता आणखी कोणत्याही निकषाची गरज आहे असे वाटत नाही.
बिहारमध्ये जन्मलेला किशन 22 वर्षांचा असून सध्या तो झारखंडकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याने आजवर आयपीएल स्पर्धेत खेळलेल्या 41 सामन्यांत 132 च्या सरासरीने 800 पेक्षाही जास्त धावा केल्या आहेत. त्याने 19 वर्षांखालील भारतीय संघाचे विश्वकरंडक स्पर्धेत नेतृत्वही केले आहे. 2016 साली त्याने आयपीएल स्पर्धेत पदार्पण करताना गुजराथ लायन्सकडून केळ केला. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून तो आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टिरक्षक फलंदाज ऍडम गिलख्रिस्टनेही किशनबाबत भारतीय संघाचे भविष्य, असे मत व्यक्त केले होते. त्याला अद्याप भारतीय संघात खेळण्याची एकही संधी मिळालेली नाही. ही स्पर्धा संपल्यावर संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार असून त्यातील एकदिवसीय व टी-20 सामन्यांच्या मालिकेत त्याची निवड झाली तरच त्याला आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी भक्कम व्यासपीठ मिळेल. त्यात तो यशस्वी ठरला तर धोनीचा पर्याय कोण या प्रश्नाला पूर्णविरामही मिळालेला असेल.