-अमित डोंगरे
अमिरातीत यंदा सुरू झालेल्या आयपीएल स्पर्धेत अद्याप रंगत अशी दिसलीच नसली तरी येत्या काही सामन्यांपासून दिग्गज फलंदाज भरात येतील व पॉवर हिटिंगची मजा येइल. हिट आऊट गेटआऊट या साध्या तत्त्वावर टी-20 सामने खेळले जातात. प्रत्येक फलंदाजाला यात संधी मिळते असे नाही.
पहिल्या मोसमात राहुल द्रविड किंवा व्हीव्हीएस लक्ष्मण हे जरी आयकॉन खेळाडू म्हणून नेमले गेले असले तरी आता कसोटी फलंदाजांसाठी ही स्पर्धा नाही हे चेतेश्वर पुजाराला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही तेव्हाच स्पष्ट झाले. क्रिकेटचा हा प्रकारच असा आहे की त्यात चेंडूवर एकेरी व दुहेरी धावा काढण्याला काहीही महत्त्व नाही. तुम्ही जोखीम किती घेता व चौकार, षटकारांची आतषबाजी कशी करता याला महत्त्व आहे. तुमचे तंत्र किती चांगले आहे याकडे कोणीही पाहात नाही.
सुनील गावसकर एकदा म्हणाले होते की, चौकार किंवा षटकार फटकावला गेला की तो संघाची धावसंख्या वाढवतो. हा फटका तंत्रशुद्ध पद्धतीने मारला गेला का हे कोणीही पाहात नाही. चार वेळा जीवदान मिळाले असले व शतक पूर्ण झाले तर रेकॉर्डबुकमध्ये त्याची शतक अशीच नोंद होते. शतक हे शतक असते ते कसे बनले हे महत्त्वाचे नाही. त्याच धर्तीवर टी-20 क्रिकेट चालते. यंदाच्या स्पर्धेत प्रत्येक संघात आक्रमक फलंदाज आहेत. मात्र, ते सगळेच काही पॉवर हिटर्स नाहीत. त्यामुळे जसजशी स्पर्धा पुढे जाईल, तसे पॉवर हिटर्सची फलंदाजी पाहण्यात मजा येणार आहे.
बेस्ट फिनिशर महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, कॅरन पोलार्ड, इयान मॉर्गन, लोकेश राहुल, विराट कोहली, एबी डीविलियर्स, ख्रिस गेल, फाफ डुप्लेसी, कॉन्टन डीकॉक, ऍरन फिंच, शेन वॉटसन, अम्बाती रायडू, शिखर धवन, शेल्डन हेटमायर, मार्कस स्टोनिस, ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे, संजू सॅमसन, डेव्हिड मीलर, रॉबीन उथप्पा, सुनील नरेन, आंद्रे रसेल हे फलंदाज जागतिक क्रिकेटमधील सर्वात आक्रमक व पॉवर हिटर्स फलंदाज म्हणून ओळखले जातात.
यंदाच्या स्पर्धेत आखातातील खेळपट्ट्या पाहिल्या तर त्या फलंदाजीसाठी नंदनवन ठरत आहेत. काहीवेळा बलाढ्य फलंदाज असूनही काही संघांना मोठी धावसंख्या उभारता आलेली नसली तरी हे सर्व खेळाडू करोनाच्या धोक्याच्या काळात आपापल्या घरात बसून होते व त्यामुळे त्यांना हवा तसा सराव मिळालेला नाही, हेदेखील लक्षात घेतले पाहिजे. मार्च महिन्यापासून जगभरात करोनाचा धोका वाढल्याने क्रीडाक्षेत्रच ठप्प झाले होते. त्यानंतर जवळपास सहा महिन्यांच्या खंडांनंतर क्रिकेट सुरू झाले आहे. त्यातही इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज व पाकिस्तान हे संघ वगळता भारतासह अन्य संघांना कोणत्याही स्पर्धेत सहभागी होता आलेले नाही.
आखातात करोनाचा धोका फारसा नसल्याने यंदा ही स्पर्धा येथे आयोजित करण्यात आली आहे. सर्व संघांतील खेळाडूंना येथे दाखल झाल्यानंतर काही दिवस विलगीकरणात राहावे लागले. त्यामुळे त्यांच्या मनस्थितीवरही परिणाम झालेला आहे. याची प्रत्यक्ष कबुलीही धोनीने दिली. यावरूनच लक्षात येते की धोनीसह हे सर्व पॉवर हिटर्स अद्याप त्यांच्या मिडास टचमध्ये आलेले नाहीत.
टी-20 क्रिकेट जेव्हापासून सुरू झाले तेव्हापासून संघात केवळ आक्रमक फलंदाज असावे असेच धोरण प्रत्येक संघाचे राहिलेले आहे. त्यातही पृथ्वी शॉ, शुभमन गिल वगैरे फलंदाज आक्रमक असले तरीही ते पॉवर हिटर्स म्हणून अद्याप ओळख तयार करू शकलेले नाहीत. त्यांच्यासमोर खूप मोठी कारकीर्द असून ते भविष्यातील पॉवर हिटर्स समजले जात आहेत. मात्र, तरीही ही स्पर्धा षटकामागे 10 किंवा 15 च्या सरासरीने धावा करणाऱ्या पॉवर हिटर्ससाठीच ओळखली जाते. टी-20 क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूपासून आक्रमण करा, संपूर्ण प्रतिस्पर्धी संघ तुमचा मांडलिक होईल हेच सूत्र बाळगले जाते.