-अमित डोंगरे
संघ नेतृत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या स्टार खेळाडूंपेक्षा यंदाच्या स्पर्धेत लोकेश राहुलनेच आपली चुणूक सिद्ध केली आहे. महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, स्टिव्ह स्मिथ या बड्या कर्णधारांपेक्षाही त्याने आपल्या काही निर्णयांमुळे कोहलीचा वारसदार आपणच होऊ शकतो याची साक्षही दिली.
संघ कितीही भक्कम असला तरीही त्याचे सुकाणू ज्याच्या हाती असते तो हुशार पाहिजे अन्यथा ते जहाज बुडायला वेळ लागत नाही. रॉयल चॅलेंजर बेंगळुरू संघाची गत पाहिली तर हे सिद्ध होते. ज्या संघाचा कर्णधार कोहली, धोनी किंवा रोहित आहेत त्या संघांना सातत्य राखता येत नसून त्या मनाने राहुलच्या किंग्ज इलेव्हन पंजाबने मात्र, स्पर्धेत सर्वाधिक सरस कामगिरी करून दाखवली आहे. आत्ता कुठे स्पर्धा सुरू झाली आहे लगेच कर्णधारांच्या क्षमतेवर टीका कशासाठी असा प्रश्न पडेल पण फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असे म्हणतात ते काही खोटे नाही. ज्या राहुलला धोनीच्या जागी अन्य कोणाचा पर्याय समोर दिसत नसल्याने यष्टीरक्षणाची अतिरिक्त जबाबदारी कोहलीने भारतीय संघात दिली त्याच राहुलने कोहलीपेक्षाही या स्पर्धेत सरस नेतृत्व केले.
यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत सर्वच संघांचे सामने झाले असून त्यात राहुलच एक कर्णधार म्हणून सरस असल्याचे दिसून आले आहे. पुढील सामन्यांमध्ये धोनी, रोहित व कोहली यांच्याकडून संघाला काय व कसे मार्गदर्शन मिळते यावरच त्यांच्या नेतृत्वातील हुकुमत दिसून येणार आहे. परंतु एक फलंदाज व कर्णधार म्हणून सध्यातरी राहुलच यशस्वी ठरला आहे.
यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीवर नजर टाकली तर राहुलच अग्रस्थानी आहे. यंदाच्या स्पर्धेतील पहिला शतकवीरही तोच बनला. त्याने कर्णधार म्हणून जी कामगिरी सुरुवातीलाच केली आहे त्याची बरोबरी देखील धोनी, रोहित व कोहलीला जमलेली नाही. एक कर्णधार म्हणून संपूर्ण संघाची जबाबदारी घेत राहुलने या सर्व स्टार खेळाडूंना मागे टाकले आहे. फलंदाजीचा विचार केला तरी राहुलच या तिघांपेक्षाही पुढे आहे. त्याने 3 सामन्यांतून 222 धावा केल्या आहेत. कोहलीला तीन सामन्यांतून केवळ 29 धावाच करता आल्या आहेत.
रोहित आखातात फार यशस्वी ठरलेला नाही. पण धोनीबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पूर्वी धोनी संघ अडचणीत असला तर वरच्या क्रमांकावर फलंदाजीला येत असे व संपूर्ण संघाचे जहाज किनारपट्टीला लावत असे. आता तो धोनी कुठेतरी हरवला आहे. या स्टार खेळाडूंच्या मनाने स्मिथने थोडीफार सरस कामगिरी केली आहे. त्याने दोन सामन्यातून 119 धावा केल्या आहेत. रोहितने स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध अपयशी ठऱल्यावर कोलकाताविरुद्ध 80 धावांची खेळी केली. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा बेंगळुरूविरुद्ध त्याला अपयशच आले आहे.
धोनीदेखील कोहलीच्या वाटेवर चालला आहे. त्याला तीन सामन्यांतून केवळ 44 धावाच करता आल्या आहेत. काय गंमत आहे ना पूर्वी धोनीच्या पावलावर पाऊल ठेवून कोहलीची वाटचाल सुरू होती, आज धोनी कोहलीच्या मार्गावरून चालताना दिसत असून त्याचाच त्रास त्याच्या चाहत्यांनाही होत आहे. मात्र, या सगळ्यात राहुल सर्वोत्तम कर्णधार म्हणून पुढे येत आहे हीच चांगली गोष्ट ठरत आहे.